Join us

राज्यातील धरणांमध्ये सरासरी ४०.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक, कोणत्या विभागात किती पाणी?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 23, 2024 11:28 AM

कमाल तापमान ३० अंश सेल्सियसच्याही पुढे गेले असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.

राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सियसच्याही पुढे गेले असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. दरम्यान, राज्यातील धरणांचा साठा वेगाने खालावल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

राज्यात आता सरासरी ४०.७४ टक्के पाणीसाठा राहिला आहे. औरंगाबाद विभागात आता २३.५६ टक्के पाणीसाठा उरला असून पुण्यातील धरणांमध्ये ४१.१४ टक्के पाणी उरले आहे.

नाशिकमधील धरणांमध्ये आता सरासरी ४२.४५ टक्के पाणी उरले असून नागपूर विभागात ५०.२७ टक्के तर अमरावतीमध्ये ४७.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कोकण विभागात ४७.३२ टक्के पाणी शिल्लक आहे.

मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ २३.३६टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच तारखेला हा पाणीसाठा ५२.३६ टक्के शिल्लक होता. 

आज दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८च्या सुमारास जायकवाडी धरणात केवळ ६३५.६७ दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. तो आता ५०७.०८ दलघमी पाणीसाठा उरला आहे.

राज्यातील एकूण २९९४ लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आज ४०.४८ टक्के पाणीसाठा राहिला असून  दोन दिवसांपूर्वी हा पाणीसाठा ४८.७१ टक्के एवढा होता.

राज्यात बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा खंड वाढू लागला असून वाडी वस्त्यांमध्ये टँकर वाढले आहेत. 

जाणून घ्या कोणत्या विभागात किती पाणी...

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाई