मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने उत्तराखंडपासून लगतच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईसह राज्यभरात पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. पावसाची ही विश्रांती किमान २० ऑगस्टपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर कदाचित पाऊस पुन्हा सुरू होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, गेल्या ७ दिवसांत राज्यात जवळपास पाऊस पडलेला नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्हे सामान्य पावसाच्या स्थितीपेक्षा कमी आहेत. शेतीसाठी हा चिंतेचा मुद्दा आहे. निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले की, मुंबईत आणि राज्यात कुठेही सध्या पावसाची चिन्हे नाहीत.
चांगला पाऊस
मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर आणि नांदेड याच जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला असून, तोदेखील तुटीत आहे. २० ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची चिन्ह नाहीत. मुंबईत फार काही मोठा पाऊस पडणार नाही.
पावसाची तूट
सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, अकोला आणि अमरावती हे जिल्हे आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या जिल्ह्यात पावसाची तूट आहे.