Join us

Tembhu Project टेंभू योजना तब्बल १६९ दिवसांपासून अखंडित सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 9:42 AM

टेंभू उपसा सिंचन योजना tembhu lift irrigation project २६ डिसेंबर २०२३ पासून तब्बल १६९ दिवस अखंडितपणे सुरू आहे. यामुळे २४० गावांतील ६७ हजार हेक्टर लाभक्षेत्राला लाभ मिळाला.

प्रताप महाडिककडेगाव: टेंभू उपसा सिंचन योजना २६ डिसेंबर २०२३ पासून तब्बल १६९ दिवस अखंडितपणे सुरू आहे. यामुळे २४० गावांतील ६७ हजार हेक्टर लाभक्षेत्राला लाभ मिळाला. या योजनेच्या वाट्याचे कोयना धरणातून सोडलेले १३ टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उचलून लाभक्षेत्रातील पिकांना देण्यात आले.

अखंडित रब्बी व उन्हाळी आवर्तनामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास दिलासा मिळाला. टेंभू उपसा सिंचन योजना आता पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे.

अपूर्ण कामे पूर्ण होताच टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत टेंभू येथील बॅरेजमधून कोयनेतून उपलब्ध होणाऱ्या २२ टीएमसी पाण्याचा सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास लाभ मिळणार आहे.

सद्यस्थितीत टेंभूच्या ५ टप्प्यांद्वारे पाणी उचलून २६४ किलोमीटर कालवे तसेच १६७ किलोमीटर बंदिस्त पाईपद्वारे २४० गावांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यातील कमी पर्जन्यमानामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.

यामुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यास मर्यादा आल्या होत्या. या सर्व बाबी ग्राह्य धरून टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाने २६ डिसेंबर २०२३ पासून रब्बी आवर्तन सुरू केले, ते फेब्रुवारीअखेर सुरू होते.

या आवर्तनाला जोडूनच १ मार्चपासून उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले. आता उन्हाळा संपला तरी आवर्तन सुरूच असून, लाभक्षेत्रात जिथे पुरेसा पाऊस नाही अशा भागातील पिकांना पाणी देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत टेंभूचे पाणी सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळी तालुक्यास दिले आहे. सिंचन व पिण्यासाठी दिलेल्या पाण्यामुळे दुष्काळ परिस्थितीवर मात करणे शक्य झाले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतीपंपाच्या वीज बिलात सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक काळात योजनेचे कर्मचारी निवडणूक कामी व्यस्त होते. तरीही कमी मनुष्यबळावर टेंभू योजना कार्यान्वित ठेवत योग्य पाणी व्यवस्थापन शक्य झाले. अडचणीवर मात करत टेंभू प्रशासनाने अत्यंत चांगली कामगिरी केली. असे टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी सांगितले. - राजन रेड्डीयार कार्यकारी अभियंता टेंभू योजना

अधिक वाचा: Ujani Dam Water आठ दिवसांत उजनी धरणाच्या पाणीपातळीत किती टक्क्यांनी झाली वाढ

टॅग्स :टेंभू धरणकोयना धरणसांगलीसोलापूरशेतीशेतकरीदुष्काळपाटबंधारे प्रकल्पसांगोलापाणी