Join us

नीरादेवघर, भाटघर धरणांतून मोठा विसर्ग सुरू नीरा नदी पातळी ओलांडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 10:40 AM

भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरादेवघर धरणातून सुमारे ७,०६० क्युसेकने, तर भाटघर धरणातून सुमारे २२,६२१ क्युसेकने, असा एकूण २९,६९१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे

भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरादेवघर धरणातून सुमारे ७,०६० क्युसेकने, तर भाटघर धरणातून सुमारे २२,६२१ क्युसेकने, असा एकूण २९,६९१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नीरा नदीच्यापाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सांगवी येथील पुलावर पाणी आल्यामुळे भोर पोलिसांनी काही काळ भोर-कापूरव्होळ वाहतूक बंद केली होती. पाणी वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

भौर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरादेवधर धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या ५,५१३ क्युसेक विसर्ग विद्युत गृहाद्वारे ७५० क्युसेक व धरणाच्या सांडव्याद्वारे ६,३१० क्युसेक, असा एकूण नदीपात्रामध्ये ७,०६० क्युसेक करण्यात आला आहे.

तर भाटघर धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरलेले असून, मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या १९,१३१ क्युसेक विसर्गामध्ये वाढ झाली आहे.

सकाळी ७:४५ वाजता विद्युत गृहाद्वारे १,६३१ क्युसेक व धरणाच्या सांडव्याद्वारे २१,००० क्युसेक, असा नदीपात्रामध्ये एकूण २२,६३१ क्युसेक विसर्ग सुरू झालेला असून, दोन्ही धरणांतील पाण्याचा विसर्ग सुमारे २९,६९१ क्युसेकने नीरा नदीत सुरू आहे.

त्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.

दरम्यान, हिर्डोशी, भुतोंडे आणी वेळवंड खोऱ्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भाटघर आणी नीरादेवधर व गुंजवणी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, यात वाढ होत आहे. यामुळे गुंजवणी आणि नीरा नदी दुथडी भरून वाहत असून, पाऊस असाच राहिल्यास नीरा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते.

यामुळे भोर कापूरव्होळ मार्गावरील सांगवी येथील पूल काही काळ पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतूक बंद होती, तर भाटघर आणि नीरादेवघर धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे हरतळी ते संगमनेर गावांना जोडणाऱ्या पुलाला काठोकाठ पाणी लागले होते. पाणी वाढण्याच्या शक्यतेने भोर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली होती.

नीरा नदी पातळी ओलांडू शकतेपाण्याचा प्रवाह वाढल्यास हा पूलही पाण्याखाली जाऊ शकतो, तर नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुंजवणी आणि नीरा नदी दुथडी भरून वाहत असून, पाऊस असाच राहिल्यास नीरा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते.

टॅग्स :धरणपाऊसपाणीभोरनदीपुणे