टेंभुर्णी: राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे.
सीना-माढा उपसा सिंचन योजना बंद करण्यात आली असून, भीमा-सीना जोड कालवा, मुख्य कालवा व भीमा नदीतून विसर्ग सोडण्यात येत असून पुढील दोन दिवसांत मुख्य कालवा वगळता उजनी धरणावरील सर्व योजना बंद करण्यात येणार आहेत.
उजनी मुख्य कालवा १५ ते २० मे पर्यंत चालू राहणार आहे. चार महिन्यांत ५४ टीएमसी पाणीसाठा संपला आहे. २९ डिसेंबर २४ रोजी उजनी धरणाची पाणीपातळी १०० टक्के होती.
१२३ टीएमसी क्षमता असलेले उजनी सर्वाधिक मृत साठ्यातील धरण म्हणून ओळखले जाते. गतवर्षी दुष्काळामुळे उजनी केवळ ६० टक्के भरले होते, तर जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले होते.
चालू हंगामात उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत शेतीसाठी उन्हाळी हंगामात पाणी मिळू शकले. गतवर्षी उजनी वजा ४० टक्के पाणीपातळी होती, तर गत दोन वर्षापूर्वी १९ एप्रिल २३ रोजी १३.३६ टक्के अधिक पाणीपातळी होती.
सध्या उजनी धरणातून मुख्य कालवा २ हजार ९५० क्युसेक, भीमा सीमा जोड कालवा ६१० क्युसेक, भीमा नदीत ६ हजार क्युसेक, तर दहिगाव ६० क्युसेक असा एकूण ९ हजार ६२० क्युसेक विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे.
पुढील दोन दिवसांत मुख्य कालवा वगळता इतर योजनातून पाणी बंद होणार असून पुढील दोन महिने शेतीसाठी चिंतेचे असणार आहेत, तर मान्सून कधी दाखल होतो यावर शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून असणार आहे.
बंधारे भरून घेतल्याने दोन महिने चिंता मिटणार
सोलापूर व उजनी नदीकाठचा गावांना सोडण्यात आलेले पाणी टाकळी व चिंचपूर बंधारा भरून घेतल्यास दोन महिन्यांची चिंता मिटणार आहे. यानंतर आषाढी वारी दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाऊ शकते.
अतिरिक्त पाणी सोडण्याची वेळ आली नसती
सोलापूर शहराला समांतर जलवाहिनी वेळेत पूर्ण झाली असती तर आणखी उजनीतून भीमा नदीत अतिरिक्त पाणी सोडण्याची वेळ आली नसती. भीमा नदीत साधारण २० टीएमसी पाणी सोडावे लागते. साधारण आणखी १० टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात शिल्लक राहिला असता.
अधिक वाचा: शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर