टेंभुर्णी: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या आदेशानुसार उजनी धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा-सिना जोड कालवा, सिना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शनिवारी पाणी सोडण्यात आले.
शनिवारी, सकाळी १० वाजता मुख्य कालव्यातून पाणी सोडण्यात आले. बोगद्यातून २०० क्युसेक, सिना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून १०० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दोन महिन्यानंतर हे पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण पूर्ण क्षमता भरल्यानंतर १० नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले होते. या पहिल्या आवर्तनासाठी सर्व योजनेतून अंदाजे १४.१७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
सोलापूर शहराला पिण्यासाठी सोडण्यात आलेले कमी करण्यात आले असून सध्या ४ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात येणार आहे.२६ डिसेंबरपासून ५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
सध्या उजनी धरणात एकूण ११३ टीएमसी पाणीसाठा असून ५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ९३. टक्के पाणी पातळी आहे.
सायंकाळी मुख्य कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला होता. हे आवर्तन ३५ दिवस राहणार आहे. या पाठीमागे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तर नगदी ऊस व केळी पिकांसाठी पुढील दोन महिने फायद्याचे ठरणार आहेत.
गतवर्षी ७१ टीएमसी पाणीसाठा होता■ चालू वर्षी उजनी धरणात १ जूनपासून दौंड येथून २३२.१५ टीएमसी पाणी आले. तर पावसाळ्यात अतिरिक्त झालेले ११४.५३ टीएमसी पाणी नदीद्वारे, मुख्य कालवा ११.१३ टीएमसी, बोगद्यातून १.७८, सिना-माढा ०.७६ तर दहिगाव योजनेतून ०.५३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.■ गतवर्षी ५ जानेवारी रोजी उजनी धरणात एकूण ७१.२८ टीएमसी पाणीसाठा होता तर ७.९२ टीएमसी उपयुक्त पाणी साठा होता. तर १४.७९ टक्के पाणी पातळी होती.