बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यात ७३८ मिलीमीटर (१५२ टक्के) पाऊस झाला. यामुळे कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण वगळता सर्व धरणे १०० टक्के भरली होती.
अशाही स्थितीत यंदा कुकडी लाभक्षेत्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळी हंगामात कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून एकही आवर्तन सुटले नाही. त्यामुळे कुकडीच्या लाभक्षेत्रात जलसंकट उभे राहिले आहे.
पाण्याअभावी पिके जाळून चालली आहेत. कुकडीचे आवर्तन कधी सुटणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कुकडी प्रकल्पात सध्या ४ हजार २४६ एमसीएफटी म्हणजेच १४.३१ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
यामध्ये येडगाव ४८६ एमसीएफटी (२५ टक्के), माणिकडोह ५५८ एमसीएफटी (५.४८ टक्के) वडज ३५४ एमसीएफटी (३० टक्के), पिंपळगाव जोगे ४९६ एमसीएफटी (१२ टक्के) पाणीसाठा आहे.
तसेच डिंबे २३५० एमसीएफटी (१८ टक्के) चिल्हेवाडी १७८ एमसीएफटी (२२ टक्के) विसापूर १८३ एमसीएफटी (२० टक्के) घोड ३४० एमसीएफटी (७टक्के) इतका पाणीसाठा आहे.
सध्या घोड धरणातून डावा ३७५ तर उजवा कालवा ९० क्युसेकने चालू आहे तर डिंबे धरणाच्या डाव्या कालवातून ६०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने आवर्तन चालू आहे.
येडगाव धरणात २५० क्युसेकने पाणी येत आहे. पिंपळगाव जोगे धरणातून २५० क्युसेकने आवर्तन चालू आहे. हे आवर्तन आणखी १० दिवस चालेल. त्यानंतर पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉक मधून येडगाव धरणात पाणी सोडण्यावर चर्चा सुरु होईल.
कुकडी लाभक्षेत्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती का? ◼️ येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात सन २०२३-२४ मध्ये ६,६३७ एमसीएफटी पाणी सोडले होते. मात्र, सन २०२४-२५ मध्ये १४,०६१ एमसीएफटी पाणी तीन आवर्तनासाठी सोडले आहे. मात्र उन्हाळी हंगामात शेतीसाठी एक आवर्तन देणे आवश्यक होते.◼️ आता पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आवर्तन १ मे च्या दरम्यान सुटेल त्यातून बंधाऱ्यात जास्तीत जास्त १९५० एमसीएफटी पाणी सोडले जाऊ शकते.◼️ श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, पारनेर तालुक्यात अतिवृष्टी होऊनही खरीप रब्बी हंगामातील एखादे आवर्तन कमी करून उन्हाळी हंगामात शेतीसाठी एका आवर्तनाचे पाणी शिल्लक का ठेवले नाही. हे अपयश नेमके कुणाचे आहे. याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांना अधिकारधरणाच्या डेड स्टॉकमधून पाणी सोडण्याचे विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. त्यामुळे पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाणार आहे. हा निर्णय चोंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना◼️ डिंबे-माणिकडोह बोगदा करणे.◼️ धरण व कालव्यातून होणारा बेसुमार पाणी उपसा थांबविणे.◼️ शेततळ्यात सोडले जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणणे.◼️ जलसंवर्धनाची कामे वाढविणे.
अधिक वाचा: शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर