Join us

पाणीटंचाईचं सावट गडद, राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा मराठवाडा विभागात

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 05, 2024 4:47 PM

थंडीचा जोर आता ओसरला असून तापमान वाढू लागले आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला असून धरणातील पाणीसाठा खालावत आहे..

मराठवाड्यातील धरणसाठ्यात आता राज्यातला सर्वात कमी पाणीसाठा उरला आहे. तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली असताना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दरम्यान राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत असून येत्या काळात गंभीर पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद विभागातील ४४ धरणसमुहात ३६.७३ टक्के पाणीसाठा राहिला आहे. 

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असून राज्यभरातील बहुतांश भागातदुष्काळ सदृश्य परिस्थितीआहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक विहिरी, नद्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा देखील कमी होत चालला असून धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. आजच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांत अवघा 52 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. औरंगाबाद विभागात ४४ मोठी धरणे असून ८१ मध्यम व ७९५ लहान धरणे आहेत. 

मराठवाड्यातील एकूण ९२० धरणांमध्ये आता केवळ ३१.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. इतर ५ महसूल विभागाच्या तुलनेत धरणसाठ्यात राहिलेला हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. मागील वषी राहिलेल्या पाणीसाठ्यापेक्षा सुमारे ४८.४१ टक्क्यांची यंदा तूट आहे.

हिंगोलीच्या सिद्धेश्वर आणि येलदरी धरणात ३४.५२ व ५३.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी धरणात ५३.३१ टक्के पाणी शिल्लक आहे.धाराशिव जिल्ह्यातील सिना कोळेगाव धरण शुन्यावर गेले आहे. तर निम्न तेरणामध्ये १०.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.परभणीचे निम्न दुधना धरण केवळ १५.४३ टक्के भरले असून नागरिकांवर पाणीटंचाईचे सावट गडद होतानाचे चित्र आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणी