Lokmat Agro >हवामान > अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का?

अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का?

What causes sudden heavy rains? Is the rain changing its pattern? | अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का?

अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का?

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला.

शेअर :

Join us
Join usNext

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला. लहान-मोठी धरणं रात्रीतून भरली.

ऐन बैलपोळ्याच्या सणादिवशी पावसाचाही पोळा फुटला. हा चमत्कार कसा झाला? या अतिवृष्टीचा अंदाज कसा आला नाही? हवामान खात्याने दुसऱ्या दिवशी काही जिल्ह्यांत 'रेड', तर काही ठिकाणी 'यलो अलर्ट' दिला खरा; परंतु तोपर्यंत बरेच पुलाखालून पाणी वाहून गेले होते!

भर पावसाळ्याचे तीन महिने कोरडे गेल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत इतका पाऊस होतो की, वार्षिक सरासरी ओलांडून जातो. मराठवाड्यात हेच घडले. ३० ऑगस्ट रोजी एका दिवसात तब्बल ८९ टक्के पाऊस झाला. पाऊस कसला, ढगफुटी वा अतिवृष्टीच म्हणायची.

गेल्या शनिवार आणि रविवारी झालेल्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण उडाली. काल-परवापर्यंत कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या या प्रदेशात इतका पाऊस झाला की, सगळीकडे पाणीच पाणी झाले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टधामुळे झालेल्या या अतिवृष्टीने मराठवाड्यासह शेजारच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक नद्यांना पूर आला. सगळी धरणं भरली.

धरणं भरली म्हणून समाधान मानायचे की, शेतातील काढणीला आलेल्या खरीप पिकांचा चिखल झाला म्हणून डोक्याला हात लावून बसायचे, अशी द्विधा मनस्थिती या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.

मराठवाड्यातील नुकसानीची आकडेवारी पाहिली तर याचा अंदाज येऊ शकतो. या प्रदेशातील ११ लाख ३१ हजार हेक्टर जिरायती, १६ हजार २२५ हेक्टर बागायती, तर १९ हजार ७२४ हेक्टरवरील फळबागांची हानी झाली आहे.

नद्यांना आलेल्या पुरात दहा जणांचा मृत्यू झाला, तर ५०० हून अधिक पशुधन पुरात वाहून गेले. या अचानक झालेल्या अतिवृष्टीची गोळाबेरीज केली तर 'तहान भागली; पण घास हिरावला!' असा निष्कर्ष निघतो.

...पण असे का झाले?
पहिले कारण

गेल्या काही वर्षांमध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रवास महाराष्ट्रावरून पश्चिमेकडे सरकत आहे. अशा वेळेस मराठवाड्यात मोठा पाऊस होतो. वर्ष २०२१ मध्ये आलेल्या गुलाब चक्रीवादळाचा असाच परिणाम दिसून आला होता. मान्सूनचा बहुतांश काळ कोरडा आणि अचानक काही दिवस मोठा पाऊस वा गारपीट, अशी स्थिती पाहायला मिळते आहे. गेल्या दहा वर्षांतील मराठवाड्यातील पावसाच्या नोंदींचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, या प्रदेशातला एकूण पाऊस कमी होत आहे; पण अतिवृष्टी, गारपिटीसारख्या एक्स्ट्रीम इव्हेंट्सची वारंवारता मात्र वाढत आहे. यामुळे तहान भागते; पण नापिकी वाढते आहे.

दूसरे कारण
हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, दिवसेंदिवस मान्सूनचा पॅटर्न बदलत असून देशातला बहुतांश पाऊस उत्तरेपेक्षा दक्षिण भारतात एकवटत चालला आहे. म्हणजेच मराठवाडा, मध्य भारतापासून खाली. महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनच्या सुरुवातीला सांगली, कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळतो, तर त्याचा शेवट मराठवाड्यात होतो.

तिसरे कारण
ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत हवेचे तापमान वाढल्याने आर्द्रता वाढते. परिणामी ढगांची निर्मिती वाढते; पण ती अधिक आर्दता ढग फार काळ धरून ठेवू शकत नाहीत म्हणून कमी काळात मोठा पाऊस होतो. हवामानात होत असलेल्या बदलांचा हा परिणाम असू शकतो.

पावसाचा पॅटर्न बदलतोय का?
-
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत पडणाऱ्या पावसाची मागील आकडेवारी बारकाईने बघितली तर एक गोष्ट लक्षात येते. ती अशी की, या प्रदेशाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१४.२. तर खरीप हंगामातील (जून ते सप्टेंबर) ६७८.९ इतके आहे; परंतु एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या ८० ते ९० टक्के पाऊस ऑगस्टच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्यात पडतो!
- खरीप हंगामातील पावसात सातत्य नसल्याचे दिसून येते. उदा. जून महिन्यात सरासरी १३४ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना वर्ष २०१३, २०१६, २०१७ आणि २०१९ मध्ये याच महिन्यात कमी-अधिक पाऊस झाला.

या वर्षातील मागील तीन महिन्यांत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहिली तरी ही बाब लक्षात येईल.
जून १७० मि.मी
जुलै १७२ मि.मी
ऑगस्ट १७१ मि.मी
१ सप्टेंबर ८७ मि.मी पाऊस झाला

पाणी आले अन् वाहून गेले!
जल व सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार प्रतिहेक्टर ओलिताखाली येण्यासाठी ३००० घनमीटर पाण्याची आवश्यकता असते. या मापदंडानुसार विचार केला तर मराठवाड्यात आजमितीला ७१५४ द.ल.घ.मी. पाण्याची तूट आहे. समजा मराठवाड्यातील ४४ मोठे प्रकल्प (क्षमता ५९३८.८६), ८१ मध्यम (१२२५.६३) आणि १९३१ दलघमी क्षमतेचे ७९५ लघुप्रकल्प काठोकाठ भरले तरी या प्रदेशात एकूण जलसाठा ९०९५.६२ दलघमी इतकाच होऊ शकतो. निम्न गोदावरीतून सुमारे ५०० दलघमी पाणी वाहून जाते.

नंदकिशोर पाटील
संपादक, छत्रपती संभाजीनगर

Web Title: What causes sudden heavy rains? Is the rain changing its pattern?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.