निघोज : दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. जर दारुची दुकाने अशीच चालू राहिली तर पिढी बरबाद होईल. भविष्यातील पिढी वाचवण्यासाठी निघोजमधील दारुची बाटली आडवी करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.पारनेर तालुक्यातील निघोज येथे रविवारी दारुबंदीसाठी मतदान होणार असून दारुबंदीच्या प्रचाराचा शुभारंभ अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला. मळगंगा मंदिरासमोरील सभेत ते बोलत होते. अण्णा हजारे म्हणाले, दारुमुळे राज्याला सुमारे २७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, त्याचा विचार शासन करीत आहे. परंतु लोणी मावळा, कोपर्डीसारख्या अत्याचाराच्या घटना घडत असताना त्यामुळे होणारे नुकसान तुम्ही पैशात भरून काढू शकणार नाही. दारुमुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. खेड्यातील कायदा, सुव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत दारुबंदी होेणेच महत्वाचे असून आपण यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल झावरे म्हणाले, निघोजमधील महिलांनी उभारलेली चळवळ ही क्रांतीची चाहूल असून महिलांनी आता मतदानासाठी निर्भयपणे बाहेर पडावे, असे आवाहन केले. तर निघोजमधील दारुबंदी निवडणुकीत चिन्ह मतपत्रिकेवर घेण्यास नकार देण्याचा आपण निषेध करीत आहोत. निघोज परिवाराचे मार्गदर्शक बाबाशेठ कवाद म्हणाले, कुटुंब व्यवस्था चांगली राहण्यासाठी व निघोज गावचा संस्कारीत विकास होण्यासाठी महिलांनी दारुबंदीसाठी मतदान करावे. यावेळी बबनराव कवाद यांनी दारुबंदीसाठी आता शेवटची लढाई असून ही निवडणूक होऊ नये म्हणून दारू दुकानदार अनेक अडथळे आणत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अमृता रसाळ, सरपंच ठकाराम लंके, एकनाथ पठारे, संजय वाघमारे, कांता लंके, पुष्पा वराळ, पूजा रसाळ, मनिषा घोगरे, छाया लामखडे, जया ढवळे, भावना साळवे, शैला खराडे, सिध्दी लामखडे, ज्ञानेश्वर कवाद, भास्कर कवाद उपस्थित होते. (वार्ताहर)
भविष्यातील पिढी वाचविण्यासाठी दारुची बाटली आडवी करा
By admin | Published: July 27, 2016 12:13 AM