दोन टीएमसी अतिरिक्त पाणी
By Admin | Published: July 27, 2016 12:11 AM2016-07-27T00:11:13+5:302016-07-27T00:41:21+5:30
अहमदनगर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध यंत्रणांनी पूर्ण केलेल्या कामांमुळे जिल्ह्यात ५६ हजार टीसीएम म्हणजे दोन टीएमसीपाणीसाठा नव्याने उपलब्ध झाला आहे़
अहमदनगर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध यंत्रणांनी पूर्ण केलेल्या कामांमुळे जिल्ह्यात ५६ हजार टीसीएम म्हणजे दोन टीएमसीपाणीसाठा नव्याने उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील २७९ गावांतील १ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़
गेल्या वर्षभरात २७९ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ अभियानासाठी निवडलेल्या गावांत शिवार फेरी घेऊन आराखडा तयार करण्यात आला़ तो ग्रामसभेत सादर करून अंतिम करण्यात आला़ गावकऱ्यांच्या सहकार्याने निवड झालेल्या गावांत जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली़ या कामांमुळे प्रशासनावर सुरुवातीला टिकाही झाली़ परंतु पाऊस पडल्यानंतर या कामांचा परिणाम दिसू लागला आहे़ बहुतांश गावांतील शिवार जलयुक्त झाले असून, पाणीपातळीत वाढ झाली आहे़ जिल्हाप्रशासनाच्या माहितीनुसार जलयुक्त अभियानांतर्गत निवडलेल्या २७९ गावांत १४ हजार ४९१ कामे हाती घेण्यात आली होती़ त्यापैकी १३ हजार ९४७ कामे पूर्ण झाली आहेत.पावसाने दमदार हजेरी लावल्याने माती नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, जलस्त्रोतांची दुरुस्ती आणि शेततळ्यांत एकूण ५६ हजार ५६८ टीसीएम पाणी साठले गेले आहे़ म्हणजेच दोन टीएमसी पाणीसाठा यामुळे उपलब्ध झाला आहे़
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मातीनाला बांधातील गाळ काढणे, मातीनाला बांध, नाला खोलीकरण, जलस्त्रोतांची दुरुस्ती, सलग समपातळी चर, खोल सलग समपातळी चर, कंपार्टमेंट बंडिंग आदी कामांमुळे पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे़ ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे त्याचा वापर परिसरातील शेतीसाठी करणेही शक्य होणार आहे़ पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत़
(प्रतिनिधी)