कर्जत : कोपर्डीची घटना दिल्लीपेक्षा भयानक आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत लढा चालूच ठेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कोपर्डी ग्रामस्थांना दिली.सोमवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे विखे यांनी सांत्वन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. हा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. तपास दिरंगाईने सुरू होता. जनतेच्या रेट्यामुळे त्याचा वेग वाढला. दिल्लीपेक्षा ही घटना भयानक असताना ग्रामस्थांनी मोठा संयम दाखविला. या प्रकरणात आम्ही शेवटपर्यंत मदत करणार आहे.यावेळी विखे यांच्यासोबत भाऊसाहेब कांबळे, अण्णासाहेब शेलार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जगन्नाथ राळेभात, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी आदी हजर होते. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी पीडित कुटुंबास १ लाख रुपयांची तर बीडच्या प्रायव्हेट क्लास संघटनेतर्फे प्रा. श्रीराम चौभारे यांनी १ लाख ११ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)मुंडे, मेटे कोपर्डीत४विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी आमदार रश्मी बागल, शिवसेनेचे उपनेते रमेश खाडे, डॉ. सुजय विखे, काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, मिनाक्षी साळुंके आदी मान्यवरांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.
कोपर्डीप्रकरणी लढा चालूच ठेवू
By admin | Published: July 18, 2016 11:44 PM