जुळ्या शहरातील घटना : नागरिकांचे आरोग्य धोक्यातपरतवाडा : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी प्रभागातील गटरमलपुऱ्यात सार्वजनिक नळातील पाण्यातून शुक्रवारी सायंकाळी मृत सडलेली पाल बाहेर आली. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून हा सार्वजनिक नळ असून दस्तूरखुद्द नगराध्यक्षांचा हा वॉर्ड आहे, हे विशेष. परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराला चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेवरुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जुळ्या शहरातील सार्वजनिक व घरगुती नळाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला ठिकठिकाणी गळती आहे. लिकेजच्या नावावर लाखो रुपयांचा दुरुस्ती खर्च नगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येतो. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील गटरमलपुरा परिसरात सार्वजनिक नळ आहे. त्या नळावर नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी हाशम खान हे गेले होते. त्यांना अत्यंत गढूळ पाणी येत असल्याची जाणीव झाली. त्यांच्या पाणी भरण्याच्या भांड्यामध्ये अचानक काहीतरी पडल्याचा भास त्यांना झाला. त्यांनी निरीक्षण केले असता नळातून मृतावस्थेत सडलेली पाल आल्याची खात्री झाली. पाण्यातून दुर्गंधीदेखील येत असल्याने काहींना ओकारी झाली. हाशम खान यांनी ही बाब उपस्थित काही नागरिकांना सांगितली. हेमचंद चंदेल चांद खॉ पिंटू चंदेल, गणेश पाटील आदींनी पालिका प्रशासनाला याची माहिती दिली. यापूर्वी अचलपुरात सार्वजनिक नळातून कुत्र्याचे मांसाचे तुकडे आले होते. (प्रतिनिधी)
सार्वजनिक नळातून निघाली मृत पाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 12:34 AM