आरोग्य विभागाच्या भिंती लागल्या बोलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:38+5:302021-01-14T04:11:38+5:30
जिल्हा परिषद : स्वच्छतेचा संदेशातून जनजागृती अमरावती : ग्रामीण तसेच आदिवासी भागातील जनतेची संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेव्दारे ...
जिल्हा परिषद : स्वच्छतेचा संदेशातून जनजागृती
अमरावती : ग्रामीण तसेच आदिवासी भागातील जनतेची संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेव्दारे २८ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान स्वच्छ प्रशासन अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून झेडपीच्या आवारातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या भिंतीवर स्वच्छता संदेश देण्यासाठी लक्षवेधी संदेश लिहून जनजागृती करण्यात आली. याशिवाय परिसर स्वच्छता केल्याचे सध्या डीएचओ कार्यालय सर्वांचे लक्ष वेधत आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून जिल्हा परिषद इमारत व परिसर स्वच्छ करण्याची मोहीम मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आली.
कोरोना महामारीच्या कालावधीत आपल्या सर्वांसह सबंध मानव जातीला स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आले आहेत. कार्यालय हे आपले एक घरच असुन आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेकवेळ कार्यालयाच्या वास्तुमध्ये घालवत असतो, त्यामुळे आपली वास्तू स्वच्छ, निर्मळ आनंददायी आणि निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच हा स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनमानसात रुजविणे व त्यांच्यात उत्साह निर्माण करणे ही आज काळाची गरज आहे. अशा अभियानातून कर्मचारी व अधिकारी यांच्यात कार्यालयीन काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासोबतच समाजहिताचे विधायक काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. या दृष्टिकोनातून सीईओ अमोल येडगे यांनी स्वत: जि.प. कार्यालय व परिसराची स्वच्छता करून पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबविला. यामुळेच मिनीमंत्रालातील प्रशाकीय विभाग आता कामासोबतच स्वच्छेतवर भर देत आहे.
बॉक्स
१७ प्रकारच्या मुद्यावर भर
या अभियानांतर्गत १७ प्रकारच्या बाबींवर कार्य करण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अभिलेख वर्गिकरण, निर्लेखन, कार्यालयीन स्वच्छता व सुव्यवस्था, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच पदोन्नती प्रकरणे आदी कर्मचारी हिताच्या विषयावर भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या हितासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाला असल्याची जाणीव या माध्यमातुन जोपासली जात आहे. या अभियानाला जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील संपुर्ण अधिकारी-कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला. अभियान शंभर टक्के यशस्वी करण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.