आसेगाव पूर्णा : ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्यामुळे एक-एक मत खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे गावपुढारी, पॅनेलप्रमुख, उमेदवार यांच्याकडून कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या गावातील मतदारांना गावाकडे मतदानासाठी येण्याची आग्रही विनंती केली जात आहे. त्यांना प्रवासखर्च व आगाऊ रक्कम देण्याचे आमिष दाखविले जात आहे.
मार्च महिन्याच्या अखेरपासून लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त आसेगाव परिसरातील सावळापूर, खैरी दोनोडा, विरूळ पूर्णा, दहिगाव, कृष्णापूर आदी परिसरातील लोक मुंबई,पुणे, औरंगाबाद आदी महानगरांतून गावाकडे परतले; पण गावात प्रवेश करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यामुळे गावाकडे परतलेली मंडळी परत रोजगाराच्या शोधात महानगरात गेली.त्यामुळे गजबजलेली खेडी ओस पडली.
दरम्यान, उन्हाळ्याच्या अगोदरच लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला अन् ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली. ११ सदस्य असलेल्या आसेगाव पूर्णा ग्रामपंचायतसाठी दुरंगी लढत होत असून, विविध धार्मिक स्थळी नारळ फोडून दोन्ही गटांनी प्रचारास प्रारंभ केला. चिन्हवाटप करण्यात आल्यानंतर तो शिगेला पोहोचला. आता अंतिम टप्प्यात मतांची बेरीज-वजाबाकी केली जात आहे.
--------------
शक्तिप्रदर्शनासह दारोदारी भेट
सर्वच उमेदवारांनी दारोदारी प्रचार सुरू केला आहे. यात घरातील ज्येष्ठ नागरिकांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेऊन 'लक्ष असू द्या’ अशी विनंती केली जात आहे. त्यांच्या अडीअडचणींविषयी आस्थेवाईकपणे विचारपूस केली जात आहे. अनेक जण आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागात शक्तिप्रदर्शन करीत फेरी मारत आहेत. आपणच विजयाचे दावेदार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. गावातील वातावरण प्रचाराने ढवळून निघाले आहे.