तिळगुळ घ्या व आतातरी गोड बोला; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 01:14 PM2023-01-14T13:14:43+5:302023-01-14T13:26:02+5:30
राणा दाम्पत्याची पतंगबाजी
अमरावती : संक्रांतीनिमित्त अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाकडून पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून राणा दाम्पत्याकडून लहना मुलांना पतंगाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरेंनी आतातरी गोड बोलावे, असा टोला नवनीत राणांनी लगावला.
असे काही नावं आहेत जे नेहमी तिखट, कडू आणि खोटं बोलतात. त्यांच्यासाठी मी खास तीळगुळ पाठवते आणि आतातरी आपण खोट आणि तिखट बोलणं सोडावं, अशी मिश्कील टीप्पणी त्यांनी केली. राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह, संजय राऊत व सुषमा अंधारे यांनाही टोला हाणला.
अमरावतीसह महाराष्ट्राच्या जनतेकडून तुम्हाला तीळगुळ देते व या वर्षापासून गोड बोलायची सुरुवात करा यासाठी शुभेच्छा देते, असे राणा म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रवी राणादेखील उपस्थित होते.
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीतून नेत्यांचे पोस्टर हटविले
अमरावतीतील सायन्सकोर मैदानात आयोजित युवा स्वाभिमान पक्षाच्या कृषी महोत्सव महोत्सवस्थळी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांची छायाचित्रे असलेले मोठे बॅनर्स प्रवेशद्वारावर लावण्यात आले. आचारसंहितेचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासनाकडून शुक्रवारी ते बॅनर्स हटविण्यात आले. सुमारे दोन तास ते बॅनर्स हटविण्याची कारवाई सुरू होती. यानंतर वातावरण चांगलेच तापले. आमदार रवि राणा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. जिल्हा प्रशासनावर दबाव आणून राजकीय सूडापोटी हे बॅनर्स हटविण्यात आले असल्याचा आरोप करत या कारवाईला महाविकास आघाडीचे नेते जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हणत आगपाखड केली.