वंचितांची प्रवेश प्रक्रिया आता ‘आॅनलाईन’
By Admin | Published: February 28, 2016 12:31 AM2016-02-28T00:31:02+5:302016-02-28T00:31:02+5:30
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई-२००९) अंतर्गत वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना ...
पारदर्शी पाऊल : येत्या सत्रापासून सुरुवात, अधिक अर्ज असल्यास ड्रॉ
अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई-२००९) अंतर्गत वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खासगी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांत २५ टक्के प्रमाणात मोफत प्रवेश दिला जातो. या योजनेतील सावळागोंधळ सावरण्यासाठी येत्या शैक्षणिक सत्रात ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली. एखाद्या शाळेत मर्यादेपेक्षा अधिक प्रस्ताव असल्यास ड्रॉ काढला जाईल.
प्राथमिक किंवा ज्या शाळेला पूर्व माध्यमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गाला एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. या उपक्रमात आणखी पारदर्शीपणा येण्यासाठी शिक्षण विभागाने २०१६-१७ पासून ही प्रक्रिया आॅनलाईन केली आहे.खासगी शाळांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे बंधनकारक केले आहे. मोफत प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या शैक्षणिक संस्थेविरुद्ध शिक्षण विभाग कारवाई करणार आहे. त्यानुसार २९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत शाळांची यादी निश्चित करून त्याचे आॅनलाईन रजिष्ट्रेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ ते २८ मार्च या कालावधीत पालकाकडून प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहे. मर्यादेपेक्षा विद्यार्थ्यांचे अधिक प्रस्ताव आल्यास १ ते ५ एप्रिल या कालावधीत पहिला ड्रॉ काढण्यात येणार आहे.
खासगी शाळांना करावी लागणार जनजागृती
आरटीई कक्षेतील खासगी शाळांना व्यापक जनजागृती अनिवार्य
प्रवेश क्षमता व राखीव जागांचे बॅनर लावावे लागणार आहे.
शाळेच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध करावी लागणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्याची यादी लावणे व शिल्लक जागांसाठी पुन्हा प्रक्रिया घ्यावी लागणार आहे.
महत्त्वाची कागदपत्रे
एक लाख रूपयांपर्यंत तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षकांनी जारी केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
निवासी पुरावा आवश्यक
आरटीईनुसार शाळांमध्ये प्रवेशासाठी निवासी पुरावा आवश्यक आहे. अर्ज दाखल करताना निवासी पुराव्याच्या आधारावर शाळांची यादी समोर येणार आहे. अर्जदारांच्या घरापासून तीन कि. मी. अंतरापर्यंत किती शाळा आहेत? याची यादी अर्ज भरताना समोर येईल, त्यानुसार प्रवेश क्षमता लक्षात येईल.