ATM New Rules : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून काही आर्थिक बदलांची सुरुवात होते. तुम्ही जर एटीएम मशीनचा वापर पैसे काढणे किंवा अन्य गोष्टींसाठी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. १ मे २०२५ पासून एटीएमचे नियम बदलणार आहेत. याचा अर्थ असा की एटीएम शुल्क आता बदलत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला आरबीआयने मंजुरी दिली आहे. यापुढे दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे.
कशी आकारले जाणार शुल्क?१ मे २०२५ पासून, एका विशिष्ट मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वी १७ रुपये शुल्क आकारले जात होते, आता ते १९ रुपये असेल. तसेच, बॅलन्स तपासण्याचे शुल्क देखील ७ रुपयांवरून ९ रुपये करण्यात आले आहे. बँक आपल्या ग्राहकांना मेट्रो शहरात इतर एटीएममध्ये दरमहा ५ मोफत व्यवहार आणि बिगर महानगरांमध्ये ३ मोफत व्यवहारांची मर्यादा देते. याशिवाय, व्यवहारांवर हा वाढीव शुल्क आकारला जाईल.
एटीएमचे शुल्क वाढणारएटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांनी इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केल्यानंतर एटीएम शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एटीएम मशीनचा देखभालीचा आणि ऑपरेशनचा खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढला होता. अशा परिस्थितीत, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही मागणी रिझर्व्ह बँकेसमोर ठेवली होती. ज्याला आरबीआयने हिरवा कंदील दाखवला आहे.
एटीएम शुल्कात वाढ झाल्याने आता ज्या बँका एटीएम नेटवर्कसाठी इतरांवर जास्त अवलंबून आहेत त्यांच्यावर मोठा परिणाम होईल. ग्राहकांना आता नॉन-होम बँक एमटीए मधून पैसे काढण्यासाठी किंवा बॅलन्स तपासण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागेल. अशा परिस्थितीत, या वाढीव शुल्कानंतर, जे लोक जास्त वेळा एटीएम वापरतात त्यांनी अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी त्यांच्या गृह बँकेच्या एटीएमचा वापर करावा किंवा डिजिटल पेमेंट पर्यायाचा वापर करावा.
वाचा - सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
एसबीआयने आधीच आपल्या ग्राहकांसाठी एटीएम व्यवहार आणि शुल्कात बदल केले आहेत. ते १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झाले आहेत. परंतु, आरबीआयच्या सूचनेनुसार, १ मे २०२५ पासून, पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागेल.