Vijay Mallya and Nirav Modi Property : बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या विजय मल्ल्या आणि नीरव मोदीसारख्या उद्योगपतींवर सरकार कठोर कारवाई करत आहे. आतापर्यंत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता विकून सरकारने हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली.
आतापर्यंत किती कोटी वसूल केले?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारख्या फरार उद्योगपतींच्या मालमत्ता विकून बँकांनी 22,280 कोटी रुपये वसूल केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ही 22,280 कोटी रुपयांची संपत्ती पीडित किंवा दावेदारांना परत केली आहे. एकट्या विजय मल्ल्याची संपत्ती विकून सरकारने 14,131.6 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या मालमत्तेतून किती पैसे मिळाले?
निर्मला सीतारामन यांनी पुढे सांगितले की, नीरव मोदी प्रकरणात 1,052.58 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांना परत करण्यात आल्या आहेत. तर, मेहुल चोक्सी प्रकरणात 2,565.90 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करुन तिचा लिलाव करण्यात येणार आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) प्रकरणात, 17.47 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणुकीला बळी पडलेल्या खऱ्या गुंतवणूकदारांना परत करण्यात आली आहे.
आरोपींना सोडले जाणार नाही
पीएमएलए प्रकरणात ईडीने महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये किमान 22,280 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. आम्ही कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. तो देश सोडून पळून गेला असेल, तरीदेखील आम्ही त्याला शोधून काढू. बँकांचे पैसे परत यायलाय हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, परदेशात दडवलेल्या काळ्या पैशांबाबत काही खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाल्या की, 2015 च्या काळा पैसा कायद्याचा प्रत्यक्षात अनेक करदात्यांना प्रतिबंध होत आहे आणि ते स्वत: पुढे येत आहेत. परदेशी मालमत्ता घोषित करणाऱ्या करदात्यांची संख्या 2021-22 मध्ये 60,467 वरून 2024-25 मध्ये दोन लाख झाली आहे.