RBI Home Loan: रिझर्व्ह बँक पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेले निर्णय ७ फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे. पॉलिसीमध्ये रेपो दरात कपातीची घोषणा केली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, यावेळी आरबीआय रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची (०.२५%) कपात करू शकते. आरबीआयच्या या निर्णयाचा तुम्हालाही मोठा फायदा होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जेव्हा रेपो दरात कपात करते, तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्याईएमआयवर होतो.
जर आरबीआयनं रेपो दरात ०.२५% (२५ बेसिस पॉइंट्स) कपात केली तर ३० लाखांच्या गृहकर्जावरील आपल्या ईएमआयमध्ये किती फरक पडेल? तसंच जर तुम्हाला तुमचा ईएमआय लवकर संपवायचा असेल तर तुम्ही कोणती पावलं उचलू शकता? हे सोप्या भाषेतून आणि गणितातून समजून घेऊया.
गृहकर्जावरील परिणाम
रेपो रेट हा तो व्याजदर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. जेव्हा हा दर कमी होतो तेव्हा बँकाही कर्ज स्वस्त करतात, ज्याचा परिणाम तुमच्या ईएमआयवर होतो.
उदाहरणानं समजून घेऊ
गृहकर्जाची रक्कम : ३० लाख रुपये
सध्याचा व्याजदर : ८.५० टक्के
कर्जाचा कालावधी : २० वर्षे
चालू ईएमआय: २५,८४६ रुपये
जर आरबीआयनं रेपो दरात ०.२५% कपात केली आणि बँकांनी व्याजदर ८.२५% पर्यंत कमी केला तर तुमचा ईएमआय असा बदलेल:
नवा ईएमआय: २५,३८६ रुपये
फरक: ₹४६०/महिना
म्हणजेच तुमची दरमहा ४६० रुपयांची बचत होईल. बदललेल्या व्याजदराला आधार मानल्यास २० वर्षांत ही बचत १,१०,४०० रुपयांपर्यंत होऊ शकते.
होम लोन लवकर फेडण्याचे फायदे
व्याजावर बचत : जितक्या लवकर कर्ज पूर्णपणे फेडाल तितकं कमी व्याज कापलं जाईल. दीर्घकाळ कर्ज सुरू ठेवल्यानं व्याजाचा बोजा वाढतो.
आर्थिक सुरक्षा : कर्जमुक्त जीवनामुळे आर्थिक सुरक्षिततेची भावना वाढते.
गुंतवणुकीची संधी : कर्ज संपल्यानंतर तुम्ही तुमची बचत इतर फायदेशीर गुंतवणुकीत गुंतवू शकता.
रेपो दरातील कपातीची प्रतीक्षा
आता आरबीआय रेपो दरात कपात करते की नाही याची प्रतीक्षा असेल. ७ फेब्रुवारी रोजी पतधोरणाच्या निकालावर निर्णय होणार आहे. व्याजदरात कपात झाल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या गृहकर्जाच्या ईएमआयवर होऊ शकतो.