Bima Bharosa Portal : आरोग्य, कार किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा विमा घेताना एजंट फार गोडगोड बोलतात. सर, मॅडम म्हणत आमची कंपनी कशी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देते, याचे गुणगाण गायले जातात. प्रत्यक्षात काही कंपन्यांचा ग्राहकांना फार वाईट अनुभव येतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आरोग्य विमा दावे केलेल्या १०० पॉलिसीधारकांपैकी विमा कंपन्यांनी केवळ ८२ जणांना पैसे दिले. म्हणजे तब्बल १८ टक्के दावे फेटाळण्यात आलेत. अशी परिस्थितीत कदाचित तुमच्यावरही आली असेल किंवा भविष्यात येऊ शकते. या प्रकरणात कुठे न्याय मागावा याची माहिती असायला हवी. पण, काळजी करू नका. कारण, यासाठी विमा भरोसा पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.
विमा कंपन्यांनी सुरू केली तक्रार निवारण प्रणाली
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, २०१९ मध्ये विमा कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारण प्रणाली (CGRS) सुरू केली. या प्रणाली अंतर्गत, ग्राहक आणि सेवा प्रदाते यांच्यात अधिक पारदर्शकता असावी. ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात घेता येतील, यासाठी प्रयत्न केले जातात. ग्राहकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत, जसे की कधी पॉलिसीच्या अटी आणि शर्तींबाबत गैरसमज, कधी पॉलिसी अधिक बारकाईने समजून घेण्याची गरज असते, तर कधी सेवेबाबत काही समस्या येतात.
कंपन्यांनी सुरू केला तक्रार कक्ष
या सर्व बाबी लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी स्वत:चे तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत. यामुळे पॉलिसीधारक आणि विमा पुरवठादार यांच्यातील अंतर कमी होते. पॉलिसीधारक आता फोन, ई-मेलद्वारे किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा शाखेला भेट देऊन त्यांचे प्रश्न विचारू शकतात. यासाठी एक जीआरओ (तक्रार निवारण अधिकारी) नेहमी उपस्थित असतो. तुमची समस्या दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतात.
बिमा भरोसा पोर्टलने घेतली CGRS ची जागा
२०२२ मध्ये, भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (IRDAI) ने बिमा भरोसा पोर्टल लाँच केले. हे विमा उद्योगातील तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र म्हणून काम करते. कुठल्याही प्रकारची तक्रार आणि मदत करण्यासाठी हे पोर्टल माध्यम म्हणून उत्तम काम करते.