Join us  

नोटाबंदीनंतर १५ लाख बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:46 AM

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका नोकरदारांना बसला असल्याचे उघड झाले आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका नोकरदारांना बसला असल्याचे उघड झाले आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत १५ लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागला, असे ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने केलेल्या एका सर्व्हेत आढळून आले आहे. ‘कन्झ्युमर पिरामिड हाउसहोल्ड’ या नावाखाली हा सर्व्हे करण्यात आला होता.घरात एक जण नोकरी करत असेल तर त्या घरातील चार जण त्याच्या मासिक उत्पन्नावर अवलंबून असतात. त्यामुळे १५ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणे म्हणजे ६0 लाख लोकांचा तोंडातील घास हिरावून घेतला गेला, असा अर्थ या सर्व्हेच्या अहवालातून काढण्यात आला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात देशात एकूण ४० कोटी ५० लाख नोकऱ्या राहिल्या आहेत. देशभरात केलेल्या सर्व्हेमध्ये रोजगार व त्यांच्या बेरोजगारीसंबंधीचे आकडे गोळा करण्यात आले. या सर्व्हेसाठी १ लाख ६१ हजार घरांतील ५ लाख १९ हजार तरुणांशी त्यांच्या रोजगाराविषयी चर्चा करण्यात आली. नोटाबंदीपूर्वी ४० कोटी ६५ लाख लोकांकडे रोजगार होता. पण नोटाबंदीनंतर आता ४० कोटी ५० लाख लोकांकडे नोकऱ्या राहिल्या, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.