Join us  

८ महिन्यांत २३,५६६ कोटींचे घोटाळे, ६० कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; सीबीआयच्या मुंबई मुख्यालयाचे प्रगतिपुस्तक

By मनोज गडनीस | Published: August 28, 2023 6:05 AM

ही आकडेवारी केवळ मुंबईत सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांची आहे.

मुंबई : ८ महिने, ६० गुन्हे, २० सरकारी बँका, ६० कंपन्या आणि २३,५६६ कोटींचे आर्थिक घोटाळे. हे आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या मुंबई मुख्यालयाचे प्रगतिपुस्तक.

जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई, नागपूर, पुणे या तीन शहरांत विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी केलेल्या हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्यांचा सीबीआयने पर्दाफाश केला असून याप्रकरणी एकूण ६० गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये बांधकाम उद्योग, पायाभूत सुविधा, ज्वेलरी उद्योग, मनोरंजन उद्योग, साखर कारखाने, वेअर हाउसिंग, बायोटेक आदी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

ही आकडेवारी केवळ मुंबईत सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांची आहे. देशात अनेक राज्यांत अशाच प्रकारे बँकांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून त्याची एकत्रित रक्कम मुंबईत गुन्हा दाखल झालेल्या रकमेच्या कित्येक पट अधिक आहे. 

कोणत्या बँकांना फटका?बँकेतर्फे मोठ्या रकमेचे कर्ज दिले जाते त्यावेळी एकापेक्षा अनेक बँका यामध्ये सहभागी असतात. त्या बँकांची एक समिती तयार होते. याला इंग्रजीमध्ये कन्सॉर्शियम म्हणतात. त्या समितीतर्फे संबंधित कंपनीला कर्ज दिले जाते. कारवाईतील बहुतांश कंपन्यांच्या महाकाय रकमेच्या कर्जात अशाच पद्धतीने एकत्र येत कर्जाचे वितरण झाले आहे. 

या सर्व कर्ज वितरणांमध्ये सरकारी बँकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात पंजाब नॅशनल बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, बँक ऑफ बडोदा, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक या बँकांचा समावेश आहे.

प्रमुख बँकांना किती फटका बसला ?यातील किमान ६० प्रकरणांमध्ये सर्वाधिक फटका युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला बसल्याचे दिसते.

प्रक्रियेचे पालन नाही त्यामुळेच विलंबजेव्हा एखादे कर्ज खाते थकीत होते त्यावेळी त्याची माहिती बँकेच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यामार्फत ती भारतीय रिझर्व्ह बँक, सीबीआय व केंद्रीय दक्षता आयोगाला कळविण्याचे धोरण यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. मात्र, बहुतांश वेळा या प्रक्रियेचे पालन होत नाही. त्यामुळेच हा विलंब होतो.    - विश्वास उटगी, बँकिंगतज्ज्ञ.

एकूण आरोपी किती?चालू वर्षात बँकांनी सुमारे २०० पेक्षा जास्त कंपन्या व त्यांच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

कर्ज प्रकरणे कोणत्या कालावधीतील?ज्या कंपन्यांविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत ती कर्ज प्रकरणे २०११ ते २०२१ या कालावधीतील आहेत.

प्रमुख कोणत्या कंपन्या? (आकडे कोटींमध्ये)

    मुख्य संचालक    कंपनी    रक्कम     करुणाकरन रामचंद्र    आयएल अँड एफएस टान्सपोर्ट        ६५२४    अजित कुलकर्णी    प्रतिभा इंडस्ट्रीज लि.        ४९५७    मनोज तिरोडकर    जीटीएल इन्फ्रा.लि.        ४०६३    ऋषी अगरवाल    वद्राज सिमेंट लि.        १६८८    राजेश पोद्दार    लोहा इस्पात        १०१७    दीपक कुलकर्णी    डीएसके समूह        ५९०    नरेश गोयल    जेट एअरवेज        ५३८    रत्नाकर गुट्टे    गंगाखेड शुगर लि.        ४०९    विनय फडणीस    फडणीस समूह        १९३  

टॅग्स :बँकव्यवसाय