Join us  

आपणच जगाचे ‘राजे’! २०३० पर्यंत भारतात ७७ कोटी ग्राहक; बाजार ४६% वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 8:50 AM

जगभरात उदयाला आलेला मध्यमवर्ग हा अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक बनणार आहे.

नवी दिल्ली : वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचा लौकिक जगभरात वाढत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्राहकांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. २०३० पर्यंत भारतात ७७ कोटी ग्राहक असणार आहेत. २०२४ तुलनेत ही संख्या तब्बल ४६ टक्क्यांनी वाढणार असल्याचे भाकीत व्हिज्युअल कॅपिटलिस्टने वर्तविले आहे, तर चीनमध्ये २०३० मध्ये जगातील सर्वाधिक १०० कोटी ग्राहक असतील, असेही यात म्हटले आहे. 

जगभरात उदयाला आलेला मध्यमवर्ग हा अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक बनणार आहे. मध्यमवर्गामुळेच स्थानिक बाजारांमध्ये खप वाढणार आहे. भारत आणि चीन या दोन देशांमध्येच जवळपास दोन अब्ज ग्राहक असणार आहेत. या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कंपन्या उत्पादने बाजारात उतरवणार आहेत. उत्पादने या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्यांनी विविध रणनीतींवर आतापासून काम सुरू केले आहे. 

रशिया, जर्मनीतील ग्राहकांचे प्रमाण स्थिर राहील तर दशकाच्या अखेरपर्यंत जपानमधील ग्राहकांमध्ये ३६ लाखांची घट होईल. इटली, पोर्तुगाल, बल्गेरिया, तैवान आदी देशांतील ग्राहकसंख्या घटणार आहे. जगभरात ५० वयोगटातील संख्या वाढत आहे. एकूण ग्राहकांमध्येही यांचे प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक असणार आहे.

टॉप १० मध्ये आशियायी देशअहवालासाठी जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र संघटना आदींच्या आकडेवारीचा आधार घेतला आहे. दरदिवशी कमीत कमी एक हजार रुपये खर्च करणाऱ्याला ग्राहक म्हणून गृहीत धरले आहे. सर्वाधिक ग्राहकांच्या टॉप १० देशांमध्ये बहुतेक देश आशियाई आहेत. इतर देशांत हे प्रमाण वाढण्यास फारसा वाव दिसत नाही.