Join us  

Indian Economy: ३०० वर्षांपूर्वीची आयडिया, भारत होईल ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था; PM मोदींनी केलेय समर्थन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:15 AM

Indian Economy: आगामी काही वर्षांत ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य भारताने निर्धारित केले आहे.

Indian Economy: जगभरात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. जगातील अनेक देशांना मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशासह जगातील अर्थतज्ज्ञांनी पुढील काही वर्षांत भारत ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे. यातच आता आधुनिक अर्थशास्त्राचे जनक मानल्या गेलेल्या एडम स्मिथ यांच्या एका थेअरीची चर्चा होऊ लागली आहे. या थेअरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समर्थन केले असून, ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जात आहे. 

सुमारे ३०० वर्षांपूर्वी सुचलेल्या थेअरीचा अवलंब केला जात असल्याचे दिसून येत असून, एडम स्मिथ यांनी सांगितलेल्या काही थेअरीवर अनेक देश वाटचाल असून, ते गडगंड झाल्याची उदाहरणे दिली जातात. अमेरिका, युरोप, जपान, सिंगापूर, हाँगकाँग या देशांची भरारी हे यापैकी एका थेअरीचे उदाहरण असल्याचे सांगितले जाते. १९९० नंतर ज्या भारताने परकीय कंपन्यांसाठी बाजारपेठेची दारे खुली केली. पांढरा हत्ती बनलेल्या सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी भारताने पुढाकार घेतला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या एका विधानाची खूप चर्चा झाली होती. एका एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, सरकारनेच उद्योग चालवावे आणि त्याचे मालक राहिले पाहिजे, ही संकल्पना आजच्या युगात लागू पडणारी नाही. त्याची गरजही नाही आणि शक्यही नाही. म्हणूनच सरकारने व्यवसायात पडू नये, असे मोदी म्हणाले होते. 

५ ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याची महत्त्वाकांक्षा 

एडम स्मिथ यांची बाजारातील अदृश्य शक्तींबाबत एक थेअरी प्रचलित आहे. अदृश्य शक्तीचे हे तत्त्व किती महत्त्वाचे आहे, हे यावरून समजू शकते की, भारत सरकारने २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी या अदृश्य हाताचा महत्त्वाचा घटक मानला आहे. भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० मध्ये असे म्हटले आहे की, ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची भारताची महत्त्वाकांक्षा बाजारातील अदृश्य हात मजबूत करण्यावर तसेच विश्वासाची शक्ती मजबूत करण्यावर अवलंबून आहे. हा अदृश्य हात व्यावसायिक धोरणांना चालना देऊन बळकट करता येईल.

दरम्यान, एडम स्मिथ यांची जीडीपी गणना, सोने-चांदीवर आधारित अर्थव्यवस्थेच्या विरोधातील एडम स्थिम यांची थेअरी, उदार आर्थिक धोरणे यांसारख्या एडम स्मिथ यांच्या थेअरी प्रचलित असून, यातील काही थेअरींची अंमलबजावणी केल्यास भारत निर्धारित काळात ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनू शकतो, असा दावा तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थव्यवस्था