Join us  

‘एआय’ पाडेल नाेकऱ्यांचा पाऊस; १३ कोटी लोकांना मिळेल नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 6:30 AM

१३ कोटी लोकांना मिळेल नोकरी, जगात भासणार एआय तज्ज्ञांची टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता या नव्या तंत्रज्ञानामुळे कितीतरी पट अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होणार असल्याची माहितीही समोर येत आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, एआयमुळे ७.५ कोटी लोकांना नोकरी गमवावी लागू शकते. मात्र, त्याचवेळी १३.५ कोटी नव्या नोकऱ्याही त्यामुळे निर्माण होणार आहेत. 

जाणकारांच्या मते, जगातील सर्वोच्च कंपन्यांत एआय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिकांची मोठी टंचाई नजीकच्या काळात निर्माण होणार आहे. हा आकडा थोडाथोडका नव्हे, तर ८.५ कोटी इतका मोठा असेल. एवढ्या संख्येतील एआय तज्ज्ञांच्या टंचाईमुळे या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होईल. या संधीचे सोने करण्यासाठी तरुणांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम हाेणे आवश्यक आहे. 

आयबीएमचे प्रोग्राम डेव्हलपमेंट प्रमुख संजीव मेहता यांनी सांगितले की, २०३० पर्यंत प्रत्येक क्षेत्रात एआय तज्ज्ञ तरुणांची टंचाई निर्माण होईल. ज्यांना नोकरी हवी आहे, त्यांनी स्वत:ला नव्या गरजेनुसार विकसित करणे आवश्यक आहे. एकट्या भारतात ५०० मोठ्या कंपन्यांना २५ ते ३० हजार एआय तज्ज्ञ लागतील. मेहता यांनी सांगितले की, एआयमुळे जीडीपीमध्ये १.४ टक्के वाढ होईल. बड्या कंपन्यांना येत्या ५ वर्षांत २.५ लाख कोटींचा लाभ होईल.

अनुभवी लोकांकडे असतील  तब्बल १५ कोटी नोकऱ्या 

वॉशिंग्टन : अनुभव मोठा असतो. कामाच्या बाबतीतही हेच तत्त्व बहुतांशी लागू होते. २०३० पर्यंत श्रमशक्तीमध्ये म्हणजेच नोकऱ्यांमध्ये १५ कोटी नोकऱ्या ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या ताब्यात असतील. बेन अँड कंपनीच्या एका सर्वेक्षण अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

कंपन्यांकडून अनुभवाला महत्त्वसध्या कंपन्या अनुभवाला महत्त्व देत आहेत. त्यामुळे नोकऱ्यांतील ज्येष्ठांचे प्रमाण वाढत आहे. २०३१ मध्ये जी-७ देशातील श्रमशक्तीत ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक होईल. चीनमध्ये ज्येष्ठांची (६५ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वय) संख्या २०५० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे.

८.५ कोटी एआय तज्ज्ञांची भासणार गरज.एआय तज्ज्ञ तरुणांची मोठी टंचाई निर्माण होणार.२५ ते ३० हजार तज्ज्ञांची गरज भारतातच राहणार.

भारतातील स्थिती काय?

१९ देशांत करण्यात आले सर्वेक्षण.

५७% कर्मचारी २०२१-२२ मध्ये वाढले. 

४२%  कर्मचारी २०१६-१७   मध्ये ४० ते ५० वयोगटांतील होते. 

५१%  वाढ वर्ष २०१९-२० मध्ये नाेंदविण्यात आली. 

जपानमधील श्रमशक्तीत सर्वाधिक ४० टक्के लोक ज्येष्ठ आहेत. अमेरिका आणि युरोपात हे प्रमाण ३० टक्के आहे.

 

टॅग्स :नोकरीआर्टिफिशिअल इंटेलिजन्सभारत