Join us  

सुट्यांत हवाई तिकीट दरात दुपटीने वाढ

By admin | Published: April 14, 2017 5:18 AM

उन्हाळ्याच्या सुट्यांचा हंगाम सुरू होताच विमानांच्या तिकिटांत कंपन्यांनी भरमसाट वाढ केली आहे. काही गर्दीच्या मार्गावरील तिकिटे तर दुपटीपेक्षाही जास्त वाढली

नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या सुट्यांचा हंगाम सुरू होताच विमानांच्या तिकिटांत कंपन्यांनी भरमसाट वाढ केली आहे. काही गर्दीच्या मार्गावरील तिकिटे तर दुपटीपेक्षाही जास्त वाढली आहेत. हा आठवडा सुट्यांचा आहे. मंगळवारी हनुमान जयंती होती. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुड फ्रायडे आहे. शुक्रवारी, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस जोडून वीकएंड साजरा करण्याचा मूड देशभर दिसून येत आहे. त्यामुळे विमानांची तिकिटांची मागणी वाढली. याचा फायदा घेऊन ऐनवेळच्या तिकिटांचे दर विमान कंपन्यांनी भरमसाट वाढविले आहेत. दिल्लीहून दक्षिणेकडील राज्यांत जाण्यासाठी स्वस्तातले स्वस्त परतीचे तिकीट ३0 हजार रुपयांपर्यंत गेले. अनेकांनी त्यामुळे आपले प्लॅनच रद्द केले. दिल्ली ते मुंबई या मार्गावरील गुरुवारचे दुहेरी तिकीट २0 हजार रुपयांचे होते. आता शाळांच्या परीक्षाही संपल्या आहेत. त्यामुळे मुलांसह बाहेरगावी जाण्याचे अनेक पालकांनी ठरविले आहे. शक्यतो थंड हवेच्या शहरांत जाण्याचे अनेकांचे प्लॅन आहेत. त्यामुळे तिथे जाण्यासाठीची विमान तिकिटे तर खूपच महागली आहेत. मात्र अनेकांनी आधीच तिकिटे काढली. एकूणच आगावू तिकीट नोंदणीचे प्रमाण आता वाढले आहे. त्यामुळे ऐनवेळच्या प्रवासासाठी फारच थोडी तिकिटे शिल्लक राहतात. त्यामुळे गर्दीच्या काळात दर वाढणे अपेक्षितच आहे. सध्याची हवाई तिकिटांची मागणी शिखरावर आहे. त्यामुळे दर १0 ते १५ टक्क्यांनी वाढलेले आहेत. आगावू तिकीट बुकिंग करणाऱ्यांना याचा कोणताही फटका बसत नाही, असे प्रवासी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रवासी अधिक, विमानतळे कमीएका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगतिले की, भारत हा हवाई वाहतूक क्षेत्रात सर्वाधिक वेगाने वृद्धी करीत आहे. त्या तुलनेत विमानतळांचा विस्तार होत नाही. मुंबई विमानतळावर आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे. नवी मुंबई विमानतळाचे काही खरे दिसत नाही. ग्रेटर नोएडा विमानतळही असेच लटकले आहे. गर्दीच्या काळात अधिक विमानांना सामावून घेण्याची क्षमता विमानतळांत नाही. त्यामुळे आहे त्या विमानांच्या तिकिटांची मागणी अवास्तव पातळीवर वाढत आहे.