Join us  

Indian Stock Market: पुढील ५० वर्ष भारतीय शेअर बाजारात तेजीचा दबदबा अन् चीनला बसणार धक्का; अमेरिकेच्या दिग्गज गुंतवणूकदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 3:27 PM

Indian Stock Market: दिग्गज अमेरिकी गुंतवणूकदार मार्क मॉबियसनं (Mark Mobius) भारतीय शेअर बाजारातील पुढील ५० वर्ष तेजीचं वातावरण पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Indian Stock Market: दिग्गज अमेरिकी गुंतवणूकदार मार्क मॉबियसनं (Mark Mobius) भारतीयशेअर बाजारातील पुढील ५० वर्ष तेजीचं वातावरण पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एकूण गुंतवणूकीपैकी ५० टक्के वाटा भारत आणि तैवानच्या शेअर बाजारात गुंतवला आहे. चीनच्या शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत त्यामुळे आता भारतात गुंतवणूक करायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

मार्क यांनी चीनी शेअर बाजारात आलेल्या घसरणीची भरपाई करण्यासाठी भारत आणि तैवानमधील शेअर बाजारात पैसा गुंतवला आहे. "भारतात पुढील ५० वर्षांपर्यंत शेअर बाजारात तेजी दिसून येईल. अर्थात अधे-मधे काही वेळ मंदीचा काळही असेल. पण तेजीचं प्रमाण नक्कीच जास्त असेल", असं मार्क मॉबियस यांनी ब्लमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

"भारत आज त्या स्थानावर पोहोचला आहे की जिथं चीन १० वर्षांपूर्वी होता. सर्व राज्यांमध्ये एकसारखे नियम आणि कायदे लागू करण्याचं भारत सरकारच्या धोरणामुळे देशाला दिर्घकालीन स्वरुपात फायदा होईल", असंही मॉबियस म्हणाले. भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षी मार्च महिन्यात मोठी घसरणीची नोंद झाली होती. पण त्यानंतर शेअर बाजारात नवनवे विक्रम नोंदवले जात आहेत. मार्चच्या तुलनेत सध्या शेअर बाजार निर्देशांकात दुपटीनं वाढ झाली आहे. 

चीनमध्ये नुकसानदुसरीकडे चीनमध्ये सरकारच्या सक्तीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे आणि शेअर बाजाराचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय तेथील दिग्गज रिअल इस्टेट एजंन्सी एव्हरग्रँड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. याचाही चीनी बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. 

मॉबियस इमर्जिंग मार्केट फंडनं आपल्या पोर्टफोलिओतील जवळपास ४५ टक्के गुंतवणूक ही भारत आणि तैवानमध्ये केली आहे. सर्वाधिक पैसा टेक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये लावण्यात आला आहे. भारतात Persistent Systems आणि तैवानमधील चिप कंपनी  eMemory Technology मध्ये पैसा लावला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात दुपटीनं वाढ झाली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारचीनभारत