- राजेश निस्ताने, यवतमाळ
खरीप हंगाम आला तरी राष्ट्रीय केमिकल अॅन्ड फर्टिलायझरच्या (आरसीएफ) खत वाहतुकीच्या निविदा गेल्या नऊ महिन्यांपासून लिफाफ्यात बंद असल्याने रेल्वेचे चार रॅक पॉर्इंट अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे खताची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
‘आरसीएफ’च्या युरिया, १५-१५-१५, २०-२०-००, पोटॅश, डीएपी, सुपर फॉस्पेट या खताची डिलरमार्फत शेतकऱ्यांपर्यंत विक्री केली जाते. मुंबईतील चेंबूर व थळ (अलिबाग) या प्लँटवरून खत विविध ठिकाणच्या रेल्वे रॅक पॉर्इंटवर पोहोचविले जाते. मात्र, रेल्वे रॅक पॉर्इंटच सुरू न झाल्याने शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचणार कसे, हा प्रश्न आहे. पाऊस लांबल्याने अद्याप खताचा उठाव झालेला नाही. मात्र पाऊस पडताच वेगाने खताची मागणी वाढणार आहे.
अमरावतीत क्षेत्रीय कार्यालयामार्फत पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यातील खत वाहतूक व विक्रीवर नियंत्रण ठेवले जाते. या पाच जिल्ह्यात धामणगाव रेल्वे, बडनेरा, अकोला, वाशिम, मलकापूर, खामगाव, पिंपळखुटी येथे रेल्वे रॅक पॉर्इंट आहेत. तेथून खताची त्या-त्या जिल्ह्यात वाहतूक केली जाते. या खत वाहतुकीसाठी दरवर्षी निविदा काढल्या जातात. या निविदा एका जिल्ह्यासाठी किमान दीड ते दोन कोटी रुपयांच्या असतात. खत वाहतुकीचे जुने कंत्राट संपण्यापूर्वी नवी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु यावर्षी अद्यापही अनेक ठिकाणची खत वाहतूक निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी निविदा काढल्या गेल्या, परंतु ‘मुंबई कार्यालयातून आदेश नसल्याचे सांगत’ त्या लिफाफ्यातच ठेवल्या आहेत. पर्यायाने खरीप हंगाम सुरू होऊनही खताची वाहतूक कोण करणार हेच अनेक ठिकाणी स्पष्ट नाही.
मर्जीतील डीलरसाठी कृत्रिम टंचाई
रासायनिक खताचे दर निश्चित असले तरी कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्याबाजारात त्याचे दर वाढविण्याचे प्रकार घडतात. रॅक पॉर्इंट बंद ठेवणे, एकाच रॅक पॉर्इंटवरून अनेक जिल्ह््यात खत पुरवठा करणे, त्यातूनच कृत्रिम टंचाई निर्माण करून मर्जीतील डिलरला अतिरिक्त माल पुरवठा करणे असे प्रकार सर्रास घडतात. वाशिम, मलकापूरसाठी सप्टेंबर २०१५ मध्ये निविदा बोलावूनही अद्याप त्या उघडल्या गेल्या नाही. गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
प्रकरण मुंबई दरबारी
अमरावती येथील एका खत वाहतूकदाराने अतिरिक्त आलेल्या ११० बॅग खताची परस्पर उचल करुन विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी ‘आरसीएफ’च्या थेट मुंबई मुख्यालयात तक्रार करण्यात आली. त्यानंतर या वाहतूकदाराने तेवढ्याच खताची खरेदी करून हा साठा आपल्या खासगी गोदामात ठेवला व या मालाची विक्री झाली नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र या मालाचे बॅच नंबर वेगवेगळे निघाल्याने कंपनीने या वाहतूकदाराला रॅक पॉर्इंटवरून माल उचलण्यास मनाई केली आहे.