Join us  

बँक कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

By admin | Published: March 27, 2017 12:49 AM

सहा सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये विलीनिकरण झाल्यानंतर आता एसबीआय बँक कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात

नवी दिल्ली : सहा सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये विलीनिकरण झाल्यानंतर आता एसबीआय बँक कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे. २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्क्याने कमी करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी दिली. तथापि, भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील या सर्वात मोठ्या बँकेकडे सध्या २ लाख ७ हजार कर्मचारी आहेत. स्टेट बँक आॅफ बिकानेर अँण्ड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ पटियाला, स्टेट बँक आॅफ हैद्राबाद आणि भारतीय महिला बँकेचे ७० हजार कर्मचारी १ एप्रिलपासून एसबीआयमध्ये समाविष्ट होतील. विलीनिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ७७ हजार होणार आहे. २०१९ पर्यंत या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ६० हजार करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी कमी होऊ शकते, अशी माहितीही रजनीश कुमार यांनी दिली. पुनर्नियुक्त्या करताना संख्या कमी होऊ शकते. पण, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे हा पर्याय असू शकत नाही. कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत रजनीश कुमार म्हणाले की, थेट कपातीचा प्रश्नच उद्भवत नाही. विलीनिकरणाची क्षमता आणि शाखा नेटवर्क यांच्यावर कपात अवलंबून असेल. २०१६ - १७ मध्ये एसबीआयने १९ हजार नवीन नियुक्त्या केल्या होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधले. पण, या भरती प्रक्रियेतही आता ५० टक्के घट होईल. तथापि, नवीन भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वैच्छिक निवृत्तीचा पर्याय कपातीसाठी आम्ही स्वैच्छिक निवृत्तीचा (व्हीआरएस) पर्याय दिला आहे. अर्थात, ही नियमित प्रक्रिया असेल. दरवर्षी नियमानुसार कमी होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बदल्यात कर्मचारीही देणे शक्य नाही. दरम्यान, दरवर्षी १३ हजार कर्मचारी निवृत्त होतात. त्या सर्व जागा भरणार नाहीत. पण, ७ ते ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती दरवर्षी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. दहापैकी चौघांची नोकरी धोक्यात आयटी, बँकिंग, वस्तू निर्मिती आणि वाहन उद्योगात वाढलेल्या आॅटोमेशनमुळे येत्या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. आॅटोमेशनमुळे दहापैकी चौघांची नोकरी धोक्यात असल्याचा अहवाल पीपलस्ट्राँग या कंपनीने दिला आहे. येत्या चार वर्षांत चौथ्या फळीतील कर्मचाऱ्यांवर ही टांगती तलवार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.