Join us  

Air India चा प्रवाशांना मोठा दिलासा! G20 दरम्यान फ्लाइट असेल तर प्रवासाची तारीख बदलू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 8:01 PM

एअर इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. G20 परिषदेदरम्यान त्यांचे फ्लाइट दिल्लीहून असेल तर प्रवासी त्यांची तारीख बदलू शकतात.

दिल्लीत G20 परिषद होणार आहे. यामुळे दिल्लीत मोठी तयारी सुरू आहे. अनेत देशांचे राष्ट्राध्यक्ष या परिषद सहभाग घेणार आहेत, दिल्लीत रेल्वेसेवेसह विमानसेवेतही बदल करण्यात आला आहे. जर तुमच्या फ्लाइटची तारीखही G20 समिटच्या तारखांशी जुळत असेल, तर एअर इंडियाच्या ग्राहकांना खूप फायदा होणार आहे. टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाने कन्फर्म फ्लाइट तिकीट असलेल्या ग्राहकांना ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान प्रवासाच्या तारखा बदलण्याची सुविधा दिली आहे.

दिल्लीत G20 शिखर परिषद होत आहे. त्यामुळे राजधानीत वाहतुकीशी संबंधित अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. लोकांच्या समस्या लक्षात घेऊन एअर इंडियाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.

एअर इंडियाने सांगितले की, ७ ते ११ सप्टेंबर २०२३ दरम्यान दिल्लीमध्ये अनेक प्रवासी निर्बंध लादण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या हिताचा विचार करून कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशांनी ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान दिल्लीला जाण्यासाठी किंवा तेथून प्रवास करण्यासाठी तिकीट कन्फर्म केले आहे त्यांना लागू शुल्कात एक वेळची सूट दिली जाईल.

प्रवासाची तारीख बदलल्यास त्यांना ही सवलत मिळेल. नवीन तारखेसाठी तिकीट बुक केल्यावर, त्यांच्याकडून फक्त भाड्यातील फरकाएवढी रक्कम आकारली जाईल. कंपनीने प्रवाशांच्या सोयीसाठी कॉल सेंटरमध्ये कस्टमर केअर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी +91 124-2641407 / +91 20-26231407 जारी केले आहेत.

टॅग्स :एअर इंडियाटाटा