लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मागील काही वर्षांमध्ये देशातील अब्जाधीशांची संख्याही वाढत असून, त्यांच्या संपत्तीतही वाढ होत आहे. १० वर्षांमध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या दुपटीहून अधिक वाढली. त्यांच्याजवळील संपत्ती तिप्पट झाल्याचे एका अहवालातून समोर आले. भारतात अशी स्थिती असतानाच जागतिक पातळीवर अब्जाधीशांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते.
यूबीएस बिलिनीअर ॲम्बिशन्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मागील १० वर्षांत अब्जाधीशांची संख्या दुपटीहून अधिक वाढून १८५ वर पोहोचली आहे एप्रिल २०२४ पर्यंत त्यांच्याकडील संपत्ती तब्बल २६३ टक्क्यांनी वाढली आहे. मागच्या वर्षात भारतातील अब्जाधीशांची संपत्ती ४२ टक्के वाढून ९०५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली.
काय आहेत कारणे?
nभारतीय उद्योजकांच्या कामगिरीत सातत्य असल्यामुळे त्यांच्या कंपन्यांमध्ये
भरभराटीचे वातावरण आहे. देशातील उद्योगांना अनुकूल स्थितीही यामागेच प्रमुख कारण आहे.
nभारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असतानाच मागील दशकात प्रमुख उद्योग घराण्यांचा विस्तार झाला आहे. सर्वात मोठा कारभार असलेल्या कंपन्या बाजारातही सूचीबद्ध आहेत.
nमागील काही दिवसात देशातील फार्मास्युटिकल, एज्युकेशन टेक्नॉलॉजी, फूड डिलिव्हरी आणि फिनटेक कंपन्यांना चांगला नफा झाला आहे.
भारताबाहेर अब्जाधीशांची स्थिती कशी?
२०१५ ते २०२४ या कालखंडात जगभरातील अब्जाधीशांची संख्या १२१ टक्के वाढून १४ ट्रिलियन डॉलरच्या घरात पोहोचली. अब्जाधीशांची संख्या १,७५७ वरून वाढून २,६८२ वर पोहोचली आहे. २०२१ च्या तुलनेत ही संख्या कमी आहे. तेव्हा ही संख्या २,६८६ इतकी होती.
चीनमधील अब्जाधीशांच्या संख्येतही घट झाली आहे. चीनच्या अब्जाधीशांकडे २०२० मध्ये २.१ ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती होती. या संपत्तीत आता १६ टक्के घट झाली आहे.