BSNL News: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनं १७ वर्षांत प्रथमच नफा कमावला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीला २६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीचा विस्तार, खर्चात कपात आणि वाढते ग्राहक यामुळे हे शक्य झालंय. दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा कंपनीसाठी टर्निंग पॉईंट असल्याचं म्हटलंय.
बीएसएनएलच्या मोबाइल, एफटीटीएच आणि लीज्ड लाइन सेवांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ ते १८ टक्क्याची वाढ झाली आहे. कंपनीचे जूनमध्ये ८.४ कोटी ग्राहक होते, ते डिसेंबरपर्यंत ९ कोटींवर पोहोचले. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत बीएसएनएलनं प्रथमच २६२ कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे, अशी माहिती ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली.
खर्चही कमी झाला
कंपनीनं आपला खर्चही कमी केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही तूट १८०० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. गेल्या चार वर्षांत कंपनीचा एबिटडा दुप्पट होऊन २,१०० कोटी रुपयांवर पोहोचलाय. एबिटडा म्हणजे व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशनपूर्वीचं उत्पन्न. कंपनीचा नफा मोजण्याचा हा एक मार्ग आहे.
काय म्हणाले शिंदे?
कंपनी आता देशभरात ४जी सेवा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, नियोजित १,००,००० टॉवर्सपैकी ७५,००० टॉवर्स बसविण्यात आले आहेत आणि सुमारे ६०,००० कार्यान्वित झाले आहेत. नियोजित एक लाख टॉवर्सपैकी ७५ हजार टॉवर्स उभारण्यात आले असून सुमारे ६० हजार टॉवर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. जूनपर्यंत सर्व टॉवर कार्यान्वित होतील, असं त्यांनी सांगितलं.
सतत वाढणारी कमाई आणि नियंत्रित खर्चासह नफा टिकवण्याचं बीएसएनएलचं लक्ष्य आहे. टेलिकॉम क्षेत्रात आपलं स्थान मजबूत करण्याचंही उद्दिष्ट आहे. यापुढे कंपनी कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारे. सरकारी टेलिकॉम कंपनीला नफ्यात येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे त्यांचा संघर्ष सुरू आहे.