Join us  

Budget 2022 : यंदाचे रेल्वे बजेट असू शकते खास; 'या' 5 मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 2:42 PM

Budget 2022 : रेल्वेचे प्राधान्य सुरक्षेलाच राहणार असले, तरी या अर्थसंकल्पात इतर अनेक गोष्टींबाबत रेल्वेमध्ये नवी सुरुवात होऊ शकते.

नवी दिल्ली : मंगळवारी संसदेत मांडल्या जाणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही (Budget) लोकांच्या नजरा रेल्वे अर्थसंकल्पावर (Rail Budget) असणार आहेत. या रेल्वे अर्थसंकल्पात अनेक नवीन सुरुवात अपेक्षित आहे. रेल्वेचे प्राधान्य सुरक्षेलाच राहणार असले, तरी या अर्थसंकल्पात इतर अनेक गोष्टींबाबत रेल्वेमध्ये नवी सुरुवात होऊ शकते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या बाबींवर अधिक भर दिला जाणार आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

1) 300 वंदे भारत ट्रेन्सची निर्मिती करण्याची घोषणा केली जाऊ शकते. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी भारतातील 75 शहरांना जोडण्यासाठी नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे केले जात आहे. आता त्यात वाढ करून आणखी शहरे वंदे भारतशी जोडली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच शताब्दी व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या मार्गांवर इंटरसिटी गाड्यांप्रमाणे वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येईल.

2) येत्या अर्थसंकल्पीय वर्षात LHB कोचसह 100 गाड्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाऊ शकते. हे जर्मन-डिझाइन केलेले कोच आहेत आणि सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर जुन्या कोचच्या गाड्या बदलून LHB कोच गाड्या चालवल्या जात आहेत.

3) भारतात अॅल्युमिनियम कोचच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे उत्पादन करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशा ट्रेनची किंमत LHB पेक्षा 2.5 पट जास्त असू शकते. मात्र ती कमी ऊर्जा वापरेल. अशा गाड्या हलक्याही आहेत आणि 160 किमी वेगाने धावणे सोपे होईल. या गाड्यांना इंजिन नाही आणि वंदे भारत सारख्या सेल्फ प्रोपल्शनवर धावतात. तसेच, टिल्टिंग टेक्नॉलॉजीमुळे वक्र रस्त्यांवर त्याचा वेग कमी करण्याची गरज नाही.

4) सर्वसाधारण अर्थसंकल्पात MEMU (MEMU- Mainline Electric Multiple Unit) ऐवजी AC गाड्यांची निर्मितीची घोषणाही केली जाऊ शकते. एसी गाड्यांचे दरवाजे धावताना बंद असतात त्यामुळे त्या सुरक्षित मानल्या जातात.

5) गेल्या काही दिवसांपासून रेल्वेतील भरती प्रक्रियेबाबत वाद निर्माण झाल्यानंतर यावरही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात रेल्वे भरतीही कोणत्याही केंद्रीय एजन्सीकडे सोपवली जाऊ शकते.

टॅग्स :भारतीय रेल्वेअर्थसंकल्प 2022