Join us  

Budget 2023: एकीकडे अयोध्या, दुसरीकडे नवीन संसद निर्माण; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:32 PM

सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडून दिले आहे, याबद्दल देशवासियांचे मी आभार मानत आहे. - मुर्मू.

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषण केले. मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणात त्यांनी विविध योजनांच्या आढावा घेतला. 

२०४७ पर्यंत आपल्याला भूतकाळातील वैभवाशी जोडलेले आणि आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असलेले राष्ट्र निर्माण करायचे आहे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो 'आत्मनिर्भर' असेल आणि आपली मानवी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल, असे मुर्मू म्हणाल्या. सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडून दिले आहे, याबद्दल देशवासियांचे मी आभार मानत आहे. माझ्या सरकारने नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले, धोरण-रणनीती पूर्णपणे बदलण्याची इच्छाशक्ती दाखवली. अमृतकाळाचा हा २५ वर्षांचा कालखंड म्हणजे स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे. या काळात प्रत्येक भारतीयाला कर्तव्याचा कळस गाठायचा आहे, असे त्या म्हणाल्या. 

आयुष्मान भारत योजनेने देशातील करोडो गरीब लोकांना गरीब होण्यापासून वाचवले आहे, 80 हजार कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचवले आहेत. सर्जिकल स्ट्राईकपासून दहशतवादावर कठोर कारवाईपर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत, कलम ३७० रद्द करण्यापासून ते तिहेरी तलाकपर्यंत प्रत्येक गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर देण्याची माझ्या सरकारची ओळख आहे, असे मुर्मू म्हणाल्या. 

पूर्वी कर परतावा मिळण्यासाठी खूप वाट पहावी लागत होती. आज आयटीआर दाखल केल्यानंतर काही दिवसात परतावा मिळतो. जीएसटीच्या माध्यमातून पारदर्शकतेसोबतच करदात्यांच्या प्रतिष्ठेचीही खात्री केली जात आहे. ११ कोटी छोटे शेतकरी हे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. आता त्यांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, असे मुर्मू म्हणाल्या. 

जन धन-आधार-मोबाईलपासून ते वन नेशन वन रेशन कार्डपर्यंत बनावट लाभार्थी काढून टाकण्यापर्यंत, आम्ही खूप मोठी कायमस्वरूपी सुधारणा केली आहे. डीबीटीच्या रूपाने, डिजिटल इंडियाच्या रूपाने कायमस्वरूपी आणि पारदर्शक व्यवस्था तयार केली आहे. गरीब हटाओ ही केवळ घोषणा राहिलेली नाही. माझे सरकार गरिबांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी काम करत आहे, असे त्या म्हणाल्या. एकीकडे अयोध्याधामचा विकास सुरू आहे, तर दुसरीकडे आधुनिक संसदेची उभारणी सुरू आहे. केदारनाथ धामचा पुनर्विकास आणि काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचा विकास आणि महाकाल प्रकल्पाचे काम पूर्ण होत असून, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये बांधली जात आहेत., असे मुर्मू यांनी म्हटले. 

टॅग्स :अर्थसंकल्प 2023अर्थसंकल्पीय अधिवेशनद्रौपदी मुर्मू