Join us  

रिझर्व्ह बँकेने घेतलेले निर्णय शहाणपणाचेच!

By admin | Published: June 21, 2016 3:58 AM

विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक चलनवाढीकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. चलनवाढ आवाक्यात आणि स्थिर ठेवून रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेला व विकासालाच हातभार लावत असते

मुंबई : विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक चलनवाढीकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. चलनवाढ आवाक्यात आणि स्थिर ठेवून रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेला व विकासालाच हातभार लावत असते. त्यामुळे चलनवाढ रोखण्यावर कमी भर देऊन व्याजदरात मोठी कपात करण्याचा सल्ला न मानण्याचा बँकेने घेतलेला निर्णय शहाणपणाचाच होता, असे सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोमवारी टिकाकारांना उत्तर दिले.सध्याची मुदत सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर पुन्हा गव्हर्नरपद न स्वीकारण्याची घोषणा केल्यानंतर टाटा मुलभूत संशोधन संशोधन संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त डॉ. राजन यांचे तेथे प्रथमच भाषण झाले. डॉ. राजन म्हणाले की, मध्यम ते उच्च चनवाढीची आपल्याला गेल्या अनेक दशकांची सवय जडली आहे. यामुळे वास्तव व्याजदर उणे होऊन त्याचा फायदा उद्योगपती व सरकारला मिळत गेला आणि चलनवाढीच्या झळा मध्यमवर्गीय बचतदार आणि गरिबांना सोसाव्या लागल्या. याऐवजी आता रिझर्व्ह बँकेने मोजक्या लोकांना लाभदायक ठरणारे जुने मार्ग सोडून चलनवाढ कमीत कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.व्याजदर चढे ठेवल्याबद्दल टीका करणाऱ्यांना टोला लगावताना डॉ. राजन म्हणाले की, त्यांना वाजवी चलनवाढ आणि कमी व्याजदर हे दोन्ही एकाच वेळी कसे काय मिळू शकेल? रिझर्व्ह बँकेचे नव्याने येणारे गव्हर्नर आणि लवकरच नेमण्यात येणाऱ्या वित्तीय धोरण समितीच्या सदस्यांनी भविष्यात चलनवाढ कमीत कमी राहिल यासाठी पावले उचलायला हवीत, असेही ते म्हणाले. यासाठी सरकार व नवे गव्हर्नर आपसात समन्वयाने पावले उचलतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.डॉ. राजन असेही म्हणाले की, आपल्या वित्तीय धोरणाच्या उद्दिष्टांविषयी गुंतवणुकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे व चलनवाढ रोखण्याचे ध्येय आपण गाठू शकलो तर हा विश्वास भविष्यात आणखी दुणावेल. (विशेष प्रतिनिधी)सरकार हाताबाहेर खर्च करत राहिले तर चलनवाढ रोखण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी रिझर्व्ह बँकेला त्याची भरपाई कडक पतधोरण राबवून करणे भाग आहे.धोरण ठरविणाऱ्यांना धरसोडपणा करण्याचे स्वातंत्र्य नसते.