मुंबई : महाकाय उद्योगांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज देत स्वत:च्या व्यवसायाने उलाढालीचा हजारो कोटींचा टप्पा गाठल्यानंतर, आता बँकांनी आपला मोर्चा लघुउद्योगाकडे (एसएमई) वळविला आहे. बँकांसाठी ही व्यवसाय विस्ताराची नवी चाल असली तरी याचा फायदा मात्र
मोठ्या प्रमाणावर लघु उद्योगाला होणार आहे. नव्या ट्रेंडनुसार
आता महाकाय उद्योगांप्रमाणेच एसएमईलाही बँकांचे ‘रेड कार्पेट ट्रीटमेंट’ मिळणार आहे.
बँकिंग वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अर्थकारणाचा पाया असलेल्या एसएमई क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाल्यानंतर आणि या क्षेत्रासाठी विशेष योजनांची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आता या क्षेत्रातील अपेक्षित घडामोडींचा वेध घेत बँकांनी आपली रणनीती
आखली आहे. त्यानुसार, एसएमई उद्योगाला आता बँकिंग व्यवसायात प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी विशेष रचना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नियमित बँकिंग सेवांसोबत, दुर्गम, गावखेड्यांतून चालणाऱ्या उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकांनी डिजिटल बँकिंग तंत्रज्ञानाची मदत घेत नवे व्यासपीठ तयार केले आहे.
बँका गावखेड्यातून कार्यरत असलेल्या ‘बिझनेस करस्पॉन्डट’ च्या माध्यमातून तिथवर पोहोचणार आहेत. तसेच, एसएमई क्षेत्रातील कंपनीच्या उद्योगाच्या स्वरूपानुसार त्याला कर्ज देणे आणि एकूणच त्याची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात देशातील विविध सरकारी बँकांनी एसएमई बँकांना एक लाख २० हजार कोटी रुपयांच्या घरात कर्ज दिलेले आहे. परंतु, देशातील लघुउद्योगाची स्थिती, त्यांना आवश्यक असलेल्या भांडवलाची गरज याचा विचार करता गेल्या आर्थिक वर्षात झालेले कर्ज वितरण अतिशय कमी असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या वित्तपुरवठ्यामध्ये किमान ३० टक्क्यांनी तर वाढ होण्याची गरज व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर बँकांनी आपल्या नियोजनात केलेला बदल एसएमईसाठी फायदेशीर ठरेल असे दिसते. (प्रतिनिधी)
बँकाच्या या बदलत्या प्राधान्यक्रमाचे विश्लेषण करताना अर्थतज्ज्ञ डॉ. गोपालचारी म्हणाले की, महाकाय उद्योगांकडून थकलेल्या कर्जामुळे बँकांचा हात पोळले आहेत आणि सामान्य कर्जदाराने कर्ज घेण्यास काही मर्यादा आहेत.
या पार्श्वभूमीवर बँकांनी आपल्या नियोजनात केलेला बदल हा एसएमई उद्योगासाठी निश्चित स्वागतार्ह आहे. परंतु, एसएमई उद्योगाचे स्वरूप आणि त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन बँकांनी देखील त्यांच्या कर्ज विषयक धोरणात काही प्रमाणात शिथिलता आणली तर त्याचा निश्चित फायदा बँका आणि एसएमई अशा दोन्ही घटकांना होईल.
बाजारमूल्य १२ हजार कोटी रुपयांच्या घरात
अर्थकारणात घडणाऱ्या घडामोडी व त्यातील एसएमई क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका यांचा विचार करता एसएमई क्षेत्रातील कंपन्यांना वित्तपुरवठा सुलभतेने उपलब्ध व्हावा.
यासाठी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार अशा देशातील दोन्ही महत्त्वाच्या शेअर बाजारांनी पुढाकार घेत एसएमई एक्सेंजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सन २०१२ आणि २०१३ मध्ये ही सुविधा सुरू झाली असली तरी आता त्याबद्दलची जागरुकता वाढत असून, त्यानुसार आता इथे एसएमई कंपन्या येण्यास सुरुवात झाली आहे.
या दोन्ही शेअर बाजारांच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत १३९ कंपन्या नोंदणीकृत असून व्यवहार करत आहेत. या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य १२ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.