Join us  

दिवाळीनंतरही सोने-चांदीत तेजी; ५०० रुपयांनी वधारले 

By विजय.सैतवाल | Published: November 17, 2023 4:12 PM

चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७४ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. 

जळगाव : धनत्रयोदशीनंतर घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात दोन दिवसांपासून पुन्हा वाढ होत असून शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ते ६१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७४ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. 

गेल्या आठवड्यात धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुन्हा १५० रुपयांची वाढ होऊन ते ६० हजार ८५० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. मात्र लक्ष्मीपूजन व त्यानंतर भावात घसरण होत जाऊन ६० हजार ४०० रुपयांवर आले.  आता गुरुवार, १६ नोव्हेंबरपासून पुन्हा भाववाढ सुरू झाली आहे व गुरुवारी सोने ६१ हजारांवर पोहचले. त्यानंतर शु्क्रवार, १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन सोने ६१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. 

अशाच प्रकारे चांदीच्याही भावात वाढ होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी ७० हजार ४०० रुपयांवर आलेले चांदीचे भाव गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी ७३ हजार ७०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ७४ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. अमेरिकन डॉलरचे दर वधारत असल्याने सोने-चांदीच्याही भावात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

चांदी अडीच महिन्यांच्या उच्चांकीवरजुलै व ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. सप्टेंबर महिन्यात चढ-उतार होत राहून ४ सप्टेंबर रोजी चांदी ७४ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर तिचे भाव कमी-कमी होत गेले. त्यानंतर आता १७ नोव्हेंबर रोजी चांदी पुन्हा एकदा ७४ हजार २०० रुपयांवर पोहचली आहे.

टॅग्स :सोनंव्यवसायचांदी