Join us  

सोने महागले; चांदीचे भाव ५० हजार रुपये प्रतिकिलोवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 1:46 AM

काही दिवसांत सोने ५० हजार रुपये प्रतितोळ्याचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला.

जळगाव : भारत - चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर परिणाम सुरूच असून, मंगळवारी सोन्याचे भाव ३०० रुपये प्रतितोळ्याने वाढून ते ४९ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. काही दिवसांत सोने ५० हजार रुपये प्रतितोळ्याचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला. चांदीचे भाव मात्र ५० हजार रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे.सोने - चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे दर यांचा मोठा परिणाम होत असतो. यात आता भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने सोने-चांदीचे भाव वधारत आहेत. सोन्याच्या भावात गेल्या १३ दिवसांत दोन हजार २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोने ९ जून रोजी ४६,८०० रुपयांवर होते. ते ११ रोजी ४७,२००, १५ जून रोजी ४७,८०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर १७ जून रोजी सोन्याने ४८ हजार रुपयांचा टप्पा गाठला. भारत-चीन सीमेवर तणाव वाढतच असल्याने त्याचा परिणाम होऊन २० जून रोजी सोन्याच्या भावात थेट ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ७०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर आज आणखी ३०० रुपयांनी वाढ झाली. सोन्याच्या भावातील आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.>चांदीचे दर स्थिरसोन्यासोबतच चांदीच्याही भावात सातत्याने वाढ सुरू आहे. २० जून रोजी चांदीची भाववाढ झाली होती. एकाच दिवसात चांदी एक हजार रुपयांनी वधारली होती. चांदी५० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. त्यानंतर ती आतापर्यंत याच भावावर स्थिर आहे.>भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती असल्याने सोने-चांदीचे भाव वाढत आहेत. तणावाची स्थिती काही काळ अशीच राहिली तर अस्थिरतेचे वातावरण राहील. यामुळे सोने व चांदीचे भाव आणखी वाढून ते ५० हजारांच्या पुढे जाऊ शकतात.- सुशील बाफना,सुवर्ण व्यावसायिक, जळगाव

टॅग्स :सोनं