Join us  

दिवाळखोर Reliance Capital च्या लिलावात Hinduja ची आघाडी; लावली ९,६५० कोटींची सर्वोच्च बोली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 11:23 AM

Reliance Capital-Hinduja Group: रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला ताब्यात घेण्यासाठी हिंदुजा समूहातील कंपनीने लिलावाच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक बोली लावली आहे.

Reliance Capital-Hinduja Group: रखडलेली विविध प्रकारची देणी आणि कारभारातही गंभीर त्रुटी आढळल्याने रिझर्व्ह बँकेने दंडात्मक पाऊल टाकताना २९ नोव्हेंबर २०२१ रोजी अनिल अंबानी यांच्या समूहातील रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली. थकीत देणी फेडता न आल्याने दिवाळखोर बनलेल्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला ताब्यात घेण्यासाठी हिंदुजा समूहातील कंपनीने पार पडलेल्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत ९,६५० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. 

रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय. यांची रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिवाळखोरी व नादारी संहितेनुसार, तोडगा निघत असलेल्या वित्तीय क्षेत्रातील पहिल्या मोजक्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्स कॅपिटलचा फेरलिलावाला परवानगी दिली होती. 

हिंदुजा समूहातील कंपनीची ९,६५० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली

हिंदुजा समूहातील इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडची (आयआयएचएल) बोली गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावाच्या पहिल्या आणि रद्दबातल झालेल्या फेरीत टोरेंट इन्व्हेस्टमेंट्सने दिलेल्या ८,६४० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. लिलावाच्या या दुसऱ्या फेरीत टोरेंट इन्व्हेस्टमेंट आणि ओकट्री यांचा सहभाग नव्हता. आता मात्र, रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला ताब्यात घेण्यासाठी हिंदुजा समूहातील कंपनीने लिलावाच्या दुसऱ्या फेरीत ९,६५० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. 

दरम्यान, कर्जदात्यांच्या समितीने किमान बोलीची रक्कम पहिल्या फेरीसाठी ९,५०० कोटी रुपयांच्या तुलनेत दुसऱ्या फेरीसाठी १०,००० कोटी रुपये, त्यानंतरच्या फेऱ्यांसाठी अतिरिक्त २५० कोटी रुपये याप्रमाणे निर्धारित केली होती. तसेच कर्जदात्यांच्या समितीने सर्व बोलींमध्ये किमान ८,००० कोटी रुपये अग्रिम रोख स्वरूपात देण्याची अट ठेवली होती. त्याच आधारावर आयआयएचएलने ९,६५० कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली. रिलायन्स कॅपिटलची दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण करण्याची नियत अंतिम मुदत १६ एप्रिलला संपुष्टात आली होती. मात्र, ‘एनसीएलएटी’च्या मुंबई खंडपीठाने ती १६ जुलैपर्यंत वाढवण्यास गेल्या आठवड्यात मंजुरी दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :रिलायन्सव्यवसायअनिल अंबानी