Join us

विमा पॉलिसी नामंजूर झाल्यास पैसे बँक खात्यातच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:31 IST

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने १ मार्च २०२५पासून जीवन आणि आरोग्य विमा क्षेत्रासाठी नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने १ मार्च २०२५पासून जीवन आणि आरोग्य विमा क्षेत्रासाठी नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार ‘विमा-एएसबीए’ ही नवी सुविधा सुरू केली जाईल. यात ग्राहकांना बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम ब्लॉक करता येईल. ही रक्कम पॉलिसी मंजूर झाल्यानंतरच कापून घेतली जाईल. काही कारणास्तव पॉलिसी नामंजूर झाल्यास पैसे खात्यातच राहतील. ते परत परत मिळवण्यासाठी ग्राहकांना पुन्हा खेटे घालावे लागणार नाहीत. सुरुवातीला ही सुविधा केवळ व्यक्तिगत पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध असेल.

यूपीआय - ओटीएम अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस - वन टाइम मँडेट प्रणालीनुसार खात्यातील ठराविक रक्कम विशिष्ट कारणासाठी ब्लॉक करण्याची परवानगी दिली जाते. ही प्रणाली शेअर बाजारात वापरण्यास सेबीने मुभा दिली आहे. आयपीओ, एफपीओ, एनएफओ व्यवहारांमध्ये ही प्रणाली वापरली जाते. गुंतवणूकदारांचे पैसे शेअर्स अलॉट झाल्यानंतरच वजा होतात. त्यामुळे गुंतवणूक सुरक्षित राहते. याआधी पॉलिसी घेण्यासाठी ग्राहकांना प्रीमियमची रक्कम आधीच भरावी लागत होती.

काही कारणास्तव पॉलिसी नाकारली गेल्यास घेतलेले पैसे लगेच परत मिळत नसत. नव्या प्रणालीमुळे या त्रासापासून सुटका होणार आहे.

टॅग्स :व्यवसाय