ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - गेल्या काही वर्षापासून वेगाने विकसित होत असलेल्या भारतासाठी आर्थिक आघाडीवरून चांगली खबर आली आहे. पुढच्या काही काळातच भारतीय अर्थव्यवस्था ग्रेट ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याची शक्यता आहे. गेल्या दीडशे वर्षात असे पहिल्यांदाच घडणार आहे.
गेल्या 25 वर्षांपासून होत असलेली भारताची प्रगती आणि ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर ब्रिटिश पौंडच्या किमतीत झालेली घट यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बलाढ्य ब्रिटिश अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याची संधी मिळणार असल्याचे फोर्ब्ज या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे.
जीडीपी विकासदराच्याबाबतीत भारतीय अर्थव्यवस्था 2020 पर्यंत ग्रेट ब्रिटनला मागे टाकण्याची संधी आहे. असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे, तर दोन्ही देशांच्या विकासाचा दर पाहता भारत 2017 मध्येच ब्रिटनला मागे टाकेल, असा दावा भारतीय अर्थतज्ज्ञ करत आहेत. भारताचा सध्याचा जीडीपी हा 153 लाख कोटी इतका आहे. तर इंग्लंडचा जीडीपी 156 लाख कोटी आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेत केवळ 3 तीन लाख कोटींचे अंतर राहिले आहे.