Join us  

इंटरनेट उलाढाल ९५ हजार कोटींची

By admin | Published: January 21, 2017 4:38 AM

काही वर्षांपूर्वी इंटरनेटचे काम पडले तर थेट इंटरनेट कॅफेमध्ये धाव घ्यावी लागत होती;

विलास शिवणीकर,

औरंगाबाद- काही वर्षांपूर्वी इंटरनेटचे काम पडले तर थेट इंटरनेट कॅफेमध्ये धाव घ्यावी लागत होती; पण आता बोटांवर इंटरनेट खेळविणाऱ्या पिढीच्या काळात इंटरनेटचे जगच आम्ही खिशात घेऊन फिरत आहोत. जगण्याचा अविभाज्य घटक होऊन बसलेल्या या इंटरनेटची देशातील आर्थिक उलाढाल थोडीथोडकी नव्हे, तर ९५ हजार कोटी रुपयांची होणार आहे. फार नाही तीन चार वर्षांत हे चित्र दिसणार आहे. कारण, आजच्या घडीलाच ही उलाढाल तीस हजार कोटींच्या घरात आहे. एकूणच काय तर मोबाईल इंटरनेटचे सर्वात मोठे मार्केट म्हणून भारताकडे सध्या बघितले जात आहे. ‘इंटरनेट कन्टेन्ट रेटिंग असोसिएशन’ने (आयसीआरए) काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी जाहीर केली आहे. मोबाईल डेटा सर्व्हिसच्या माध्यमातून मिळणारा महसूल वाढत आहे. २०२१ पर्यंत हा महसूल ९५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. २०११-१२ मध्ये हा महसूल ३,२०० कोटी रुपयांचा होता. तो २०१५-१६ मध्ये २७,४५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. भारतात हायस्पीड डेटा सर्व्हिस तशी २०१० मध्ये सुरू झाली. टू-जी, थ्री-जी, फोर-जी असे अपडेट त्यात होत राहिले. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुलना केली, तर भारतातील इंटरनेटचा हा महसूल कमी असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर २०१५ च्या एका आकडेवारीनुसार देशात थ्री-जी आणि फोर-जीचे ग्राहक हे एकूण इंटरनेट वापरणाऱ्यांच्या तुलनेत ४६ टक्के होते. आता फोर-जीचा विस्तार होत असून, या ग्राहकांची संख्या आगामी काळात आणखी वाढेल, असा अंदाज आहे. >5900 कोटींचे गुगलचे मार्केट अमेरिकेची मल्टिनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी गुगलची २०१६ मधील भारतातील वार्षिक उलाढाल ५,९०० कोटी रुपयांची आहे. गुगलच्या महसुलात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गतवर्षी ही उलाढाल ४,१०८ कोटी रुपयांची होती.कंपनीने यातील निव्वळ नफा जाहीर केला नसला तरी एकूणच आकडेवारीवरून याची कल्पना यावी. देशात गुगलचे ३५ कोटी इंटरनेट युजर असून, २० कोटी स्मार्टफोन युजर आहेत. कंपनीने डिजिटल अ‍ॅडव्हर्टायजिंगवर लक्ष केंद्रित केले आहे. >177 कोटींचे फेसबुकचे उत्पन्नसोशल नेटवर्किंग सर्व्हिस देणाऱ्या अमेरिकेच्याच फेसबुकचे देशातील वार्षिक उत्पन्न ४३ टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीचे गतवर्षाचे देशातील उत्पन्न १७७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा दुप्पट म्हणजे ३१ कोटी झाला आहे. फेसबुकसाठी अमेरिकेनंतर भारत हे सर्वात मोठे मार्केट आहे.