Join us  

खर्चासाठी शहरी मध्यमवर्गींयांचा आखडता हात; FMCG कंपन्यांच्या रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:19 AM

FMCG Demand Dips : शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत झपाट्याने घट होत आहे. महागाईमुळे मध्यम वर्गीय सध्या खर्चासाठी आखडता हात घेतल्याचे दिसत आहे.

Urban Demand Slows : अनेकांना शहरातील जीवन खूप सुखकर वाटतं. सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर सिटीतील ग्लॅमर प्रत्येकाला आकर्षित करतं. मात्र, अनेकदा दुसरी बाजू समोर येत नाही. शहरात राहायचं म्हणजे तुमचं उत्पन्नही त्याचप्रमाणात असायला हवे. अन्यथा रोजच्या खर्चासाठीही हातात पैसे उरत नाही. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे FMCG कंपन्यांनी नुकतेच देशातील दोन आघाडीच्या FMCG कंपन्यांनी चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यातून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जीवनावश्यक उत्पादन करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि नेस्ले इंडिया या कंपन्यांच्या नफ्यात अनुक्रमे ४ टक्के आणि ०.९४ टक्के घट झाली आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत घटउत्पादन मागणीत घट (Consumer Demand) झाल्याचेही व्यवस्थापनही स्वीकारत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) चे सीईओ आणि एमडी रोहित जावा म्हणाले की, सप्टेंबर तिमाहीत, शहरी बाजारपेठेत FMCG मागणी कमी झाली आहे, तर ग्रामीण भागात मागणी वाढली आहे. ते म्हणाले, ग्राहकांच्या मागणीत हळूहळू होत असलेल्या सुधारणांवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. दुसऱ्या तिमाहीत HUL चा निव्वळ नफा २६१२ कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत २७१७ कोटी रुपये होता.

मध्यमवर्गीयांची खर्चात कपात करतातनेस्ले इंडियालाही शहरी भागात मागणी कमी होत असल्याचे स्पष्ट केले. नेस्ले इंडियाची जुलै-सप्टेंबर या तिमाहीत तिमाही-दर-तिमाही वाढ गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी आहे. शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांनी आपल्या खर्चात कपात केली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम दूध आणि चॉकलेट विभागावर झाला आहे. नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि एमडी सुरेश नारायण म्हणाले की, प्रीमियम वस्तूंचा खप मजबूत आहे. पण मध्यम सेगमेंटमध्ये मागणी कमी होत आहे, ज्यामध्ये बहुतेक FMCG कंपन्या आहेत.

मध्यमवर्गीयांची तारेवरची कसरतसुरेश नारायण म्हणाले, ज्यांच्याकडे पैसा आहे ते प्रचंड खर्च करत आहेत. पण मध्यमवर्गीयांना तंगी जाणवत आहे. ज्या कंपन्यांचा ग्राहक वर्ग मध्यम वर्गीय असून वाजवी किमतीत वस्तू देत आहेत, त्यांना सध्या या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश एफएमसीजी कंपन्यांना याचा फटका बसत आहे. कारण मध्यम वर्ग अडचणीत आहे. ते म्हणाले, पूर्वी कमकुवत मागणी केवळ एका तिमाहीत असायची. परंतु, आता मागणीत घट सतत 2-3 तिमाहीत दिसून येत आहे. हे पूर्ववत होण्यासाठी वेळ लागू शकतो.

 

टॅग्स :महागाईपैसागुंतवणूक