Join us  

1 लाख नोकऱ्या, डिसेंबरपर्यंत जिओची 5G सेवा..., मुकेश अंबानींच्या उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 2:51 PM

UPGIS : उत्तर प्रदेश पाच वर्षांत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. 

लखनऊ : जिओ डिसेंबर 2023 पर्यंत उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहर आणि गाव कव्हर करण्यासाठी 5G आणेल, असे यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये (UP Global Investor Summit) रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) सीएमडी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) म्हणाले. तसेच, रिलायन्सची पुढील चार वर्षांमध्ये यूपीमध्ये जिओ, रिटेल आणि नूतनीकरणयोग्य व्यवसायांमध्ये अतिरिक्त 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे, ज्यामुळे राज्यात 1 लाखाहून अधिक अतिरिक्त रोजगार निर्माण होतील, असे मुकेश अंबानी यांनी लखनऊ येथील यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये सांगितले. 

यंदाच्या अर्थसंकल्पाने भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्याचा पाया घातला आहे. यामध्ये भांडवली खर्चाच्या दृष्टीने देशाच्या विकासाचा पाया रचण्यासाठी जास्तीत जास्त संसाधनांचे वाटप करण्यात आले आहे. भारत अतिशय मजबूत विकासाच्या मार्गावर आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले. तसेच, 2018 पासून रिलायन्सने उत्तर प्रदेशात 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 75 हजार कोटींच्या नव्या गुंतवणुकीसह एकूण गुंतवणूक 1.25 लाख कोटी रुपये असणार आहे. उत्तर प्रदेश पाच वर्षांत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. 

याचबरोबर, रिलायन्स उत्तर प्रदेशमध्ये 10 गिगावॅट (GW) ची अक्षय ऊर्जा क्षमता उभारणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प असणार आहे. कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये बायो-गॅस ऊर्जा व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली. यावर मुकेश अंबानी म्हणाले की, बायोगॅसमुळे पर्यावरण तर सुधारेलच शिवाय शेतकऱ्यांनाही खूप फायदा होईल. याशिवाय, मुकेश अंबानी म्हणाले की, "आमचे शेतकरी केवळ अन्नदाता नाहीत, तर आता ते ऊर्जा पुरवठादारही होतील".

यासोबतच रिलायन्सने राज्यातील गावे आणि लहान शहरांमध्ये परवडणारे शिक्षण आणि आरोग्यसेवा यासाठी जिओ प्लॅटफॉर्मद्वारे जिओ-स्कूल आणि जिओ-एआय-डॉक्टर या दोन पायलट प्रोजेक्ट्सची घोषणा केली. तसेच, मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशच्या कृषी आणि बिगरशेती उत्पादनांची सोर्सिंग अनेक पटींनी वाढवण्याचा मानस व्यक्त केला. याचा फायदा शेतकरी, स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि लघु आणि मध्यम उद्योगांना होणार आहे. मुकेश अंबानी यांनी 2023 च्या अखेरीस उत्तर प्रदेशच्या सर्व शहरांमध्ये 5G आणण्याबाबतही सांगितले. तसेच, उत्तर प्रदेश हे नव्या भारताचे आशेचे केंद्र बनले आहे, असे  मुकेश अंबानी म्हणाले.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सउत्तर प्रदेशजिओ