Join us  

BSNL : जिओ-एअरटेलचे धाबे दणाणणार? टेलिकॉम इंडस्ट्रीचा 'बाहुबली' लवकरच मैदानात येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 3:49 PM

BSNL :येत्या काळात कंपनी १ लाख टॉवर्स उभारणार आहे. तसंच लवकर कंपनीकडून ४ जी आणि ५ जी सेवांचीही सुरुवात केली जाणारे.

रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही देशातील सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेली टेलिकॉम कंपनी आहे. तर दुसरीकडे एअरटेल (Airtel) ही देशातील सर्वात मोठी लिस्टेड टेलिकॉम कंपनी असली तरी टेलिकॉम इंडस्ट्रीचा बाहुबली एकच आहे आणि ती कंपनी म्हणजे बीएसएनएल.बीएसएनएलकडे (BSNL) मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा असल्यानं आम्ही हे सांगत आहोत. सरकारकडून बीएसएनएलला आता मोठा पाठिंबाही मिळत असल्याचं दिसून येतंय. मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि सुनील मित्तल एअरटेलची मात्र तशी स्थिती नाही. ही आता दोन्ही कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

गेल्या काही दिवसांमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मध्यंतरी खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत २५ लाख ग्राहकांची भर पडली. अशा तऱ्हेनं या कंपनीला टेलिकॉम उद्योगाच्या शर्यतीत यशस्वीपणे चालवता येऊ शकतं असा सरकार आणि बीएसएनएलमध्ये आशेचा किरण तयार झाला आहे.

५ जी सेवांचीही सुरुवात होणार

कंपनी लवकरच स्वत:ची ५जी सेवा सुरू करणार आहे. म्हणजेच जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनला कडवी टक्कर मिळणार आहे. विशेषत: जिओ आणि एअरटेलसाठी. यासाठी टेलिकॉम जायंटने अनेक स्टार्टअप कंपन्यांशी भागीदारी केली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लवकरच परवडणाऱ्या दरात ५ जी सेवा मिळू शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी टेलिकॉम कंपनी येत्या काही महिन्यांत स्टार्टअपसाठी ५जीची चाचणी घेणार असून आधी प्रायव्हेट नेटवर्क सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे.जिओ एअरटेलमध्ये भीती का?बीएसएनएल भागीदारीत काम करत असली तरी जिओ आणि एअरटेलमध्येही भीती आहे. बीएसएनएलकडे सध्या देशातील टेलिकॉमचा सर्वात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अशा परिस्थितीत कंपनी भागीदारीत स्पेक्ट्रम, पायाभूत सुविधा आणि सोर्सचं काम हाताळणार आहे. दुसरीकडे भागीदार कंपन्यांचे काम सेवा पुरविण्याचे असेल. यासाठी बीएसएनएलला टीसीएस, अकाऊंट वायरलेस आणि अमंत्य टेक्नॉलॉजीज सारख्या अनेक भारतीय कंपन्यांकडून टेस्टिंगच्या ऑफर्स आल्या आहेत. या भागीदार कंपन्या व्हॉईस, व्हिडीओ, डेटा, नेटवर्क स्लायसिंग, प्रायव्हेट ऑटोमॅटिक ब्रांच एक्स्चेंज अशा अनेक ५जी आधारित सेवांचा शोध घेतील.

मार्च २०२५ पर्यंत १ लाख टॉवर्स

ऑक्टोबर अखेरपर्यंत ८० हजार टॉवर्स आणि पुढील वर्षी मार्चपर्यंत उर्वरित २१ हजार टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत ४ जी नेटवर्कचे एक लाख टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे टेलिव्हिजन वेगाने डाऊनलोड आणि पाहण्यास मदत होईल, अशी माहिती दूरसंचार मंत्र्यांनी दिली. आपण या ४ जी कोअरवर ५जी सेवा वापरू शकतो. ५जी सेवेसाठी टॉवर्समध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यावर काम सुरू आहे. आम्ही लवकरच ४ जी ते ५ जी पर्यंतचा प्रवास पूर्ण करू, असं सिंधिया म्हणाले. अनेक ग्राहक प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून बीएसएनएलकडे वळत आहेत. आमची सेवा वेगवान होईल, असं आश्वासन आम्ही त्यांना दिलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :बीएसएनएलरिलायन्स जिओएअरटेल