Join us  

मुंबईकर कंटाळले भाड्याच्या घराला; हक्काच्या घरात जाण्यासाठी आतुर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 11:31 AM

मुंबईकरांनी गेल्या एक वर्षात नवीन घराचा किंवा गृहकर्ज पुरवठादाराचा शोध घ्यायला सुरुवात केली.

मुंबई : गुंतवणूक आणि जीवनशैली विषयक पर्याय म्हणून चारपैकी तीन मुंबईकरांचा भाड्याच्या घरातून स्वत:च्या मालकीच्या घरात जाण्याचा विचार आहे, असे एका पोस्ट जनरेशन रेंट अभ्यासातून समोर आले आहे. ५६ टक्के मुंबईकरांनी गेल्या एक वर्षात नवीन घराचा किंवा गृहकर्ज पुरवठादाराचा शोध घ्यायला सुरुवात केली. अहमदाबाद (६४ टक्के) च्या खालोखाल हे दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक प्रमाण आहे.

मुंबईतील ७७ टक्के लोक भाड्याच्या घरातून स्वत:च्या मालकीच्या घरात जाण्याचा विचार करत असल्याचे एका पोस्ट जनरेशन रेंट अभ्यासातून उघड झाले आहे. सध्याच्या घडीला नवीन घर खरेदी करणे हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे शहरातील २८ टक्के नागरिकांचे मत आहे. सुरक्षित करिअर (३८ टक्के) या मुद्द्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर स्वत:चे भविष्य सुरक्षित करण्यासाठी घर खरेदी करणे महत्त्वाचे असे २७ टक्के जणांना वाटते.

महामारी पश्चातच्या जगात स्वत:चे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ग्राहकांकडून मालमत्ता खरेदी, मालमत्ता निर्मिती आणि गुंतवणुकीचे पर्याय ठरविण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरतात आणि ग्राहकांच्या वर्तणुकीत झालेले बदल यावर प्रकाश टाकण्यासाठी हा अभ्यास केला आहे.

  • निम्म्या भारतीयांनी (४९.१३ टक्के) गेल्या एका वर्षात स्वत:साठीच्या घराचा आणि त्यासाठी गृहकर्ज वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
  • सध्याच्या घडीला नवीन घर खरेदी करणे हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे ३२.९ टक्के नागरिकांचे मत आहे.
  • २५.५ टक्के भारतीयांना स्वत:च्या मालकीचे घर असणे ही गोष्ट दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटते.
  • ४०.६ टक्के भारतीयांचे मत मिळवलेल्या नोकरीची हमी ही गोष्ट यात प्रथम क्रमांकावर आहे.
  • न्यूनॉर्मल जीवनशैलीत घरून काम करणे ही मुख्य प्राधान्याची गोष्ट असल्यामुळे  मालकीचे घर असणे ही सर्वाधिक प्राधान्याची गोष्ट असल्याचे मत १६ टक्के लोकांनी नोंदवले आहे.
टॅग्स :सुंदर गृहनियोजनमुंबई