Join us  

'टाटा' ग्रुपकडून 5G सेवेची कुठलीही योजना नाही, पण 6G साठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:43 PM

५ जी सेवा सुरू करण्याबाबत टाटाची कुठलीही योजना नाही, असेही चंद्रसेकर यांनी स्पष्ट केले. 

मुंबई - ‘वाढलेले व्याजदर आणि भडकलेली महागाई यामुळे अमेरिका, युरोप, ब्रिटनसह सगळ्याच अर्थव्यवस्था आज अडचणीत आहेत. त्यातून उभ्या राहिलेल्या शंकाकुशंकांचे सावट जगभरातल्या सगळ्याच उद्योगविश्वावर आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ खुंटलेलीच असेल; तरीही या जागतिक गुंतागुंतीत भारताची परिस्थिती भक्कम आहे.. इंडिया इज एक्स्ट्रीमली वेलप्लेस्ड,’ असा विश्वास टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांनी व्यक्त केला. तसेच, ५ जी सेवा सुरू करण्याबाबत टाटाची कुठलीही योजना नाही, असेही चंद्रसेकर यांनी स्पष्ट केले. 

लोकमत - महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ हा सन्मानाचा पुरस्कार कृतज्ञतेने स्वीकारल्यानंतर लोकमत समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासोबत संवादात ते बोलत होते. भारताची अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून जाईल. एवढेच नव्हेतर, महाराष्ट्रालाही एक  ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठण्याची संधी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी, ५ जी सेवेत टाटाच्या गुंतवणुकीबाबतही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. काही वर्षांपूर्वी  (Consumer Centric Telecom Service) क्षेत्रातील आर्थिक नुकसानीमुळे केंद्रीय दूरसंचार सेवेतून टाटा ग्रुपने काढता पाय घेतला आहे. मात्र, ४ जी आणि ५ जी साठी आधुनिक बेसिक सिस्टीम निर्माण करण्यावर ग्रुपचे काम सुरू आहे. त्यासोबतच, ६ जीमध्ये टाटा ग्रुपची गुंतवणूक असणार आहे, असेही ते म्हणाले. 

भारताच्या ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेचा आकार, ‘कंज्यूमर इकॉनॉमी’ची ताकद आणि पायाभूत संरचनेच्या विकासाशी जोडली गेलेली ‘ग्रोथ’ ही भारताची बलस्थाने असून, त्या बळावर भारत या जागतिक सावटातून सहीसलामत बाहेर येईल, असा विश्वासही चंद्रसेकरन यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :टाटा५जीमुंबईलोकमत