Join us  

नोटाबंदी हे काळ्या पैशाविरोधातील मोठे पाऊल - जेटली

By admin | Published: February 01, 2017 11:20 AM

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या गोंधळात अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या गोंधळात अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली. नोटाबंदी निर्णयानंतर देशाचा पहिलाच अर्थसंकल्प सादर होत असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. काळ्यापैशा विरोधात सरकारने लढाई सुरु केली असून नोटाबंदी निर्णयादरम्यान सरकारला सहकार्य केल्याबद्दल जेटली यांनी देशवासियांचे आभार मानले. 
 
दहशतवादी कारवाया, बनावट नोटा, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी नोटाबंदी गरजेची होती असे सांगत नोटाबंदी निर्णय महत्त्वाचा आणि धाडसी असून या निर्णयामुळे सरकारी महसूल वसुलीत वाढ झाल्याचेही यावेळी जेटली यांनी सांगितले. 
दरम्यान, करचुकवेगिरीमुळे देशातील जनतेचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
दरम्यान, संसदेचे कामकाज सुरू असताना खासदार ई अहमद यांचे निधन झाल्याने अर्थसंकल्प आज सादर करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन कामकाज तहकूब करण्यास नकार देत खरगेंची मागणी फेटाळून लावली. यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. याच गोंधळात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली.   
 
काळयापैशा विरोधात सरकारने लढाई सुरु केली आहे - अरुण जेटली.
भारताकडे जागतिक विकासाचे इंजिन म्हणून बघितले जात आहे, मागच्यावर्षभरात अनेक सुधारणा झाल्या.
 
आयएमएफनुसार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती होत आहे.
 
विकासाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पावले उचलत राहणार.
 
एफडीआयमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे 
 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार जगातला जीडीपी 2017मध्ये वाढून 3.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
 
नोटाबंदीच्या दरम्यान सहकार्य केल्याबद्दल देशाचे आभार 
 
परदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे 
 
रेल्वे बजेट आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदाच एकत्रित सादर होत आहे 
 
मागच्या अडीचवर्षात सरकारच्या कारभारात बदल झाला असून, लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे.
 
जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडलेली असतानाच मी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे.
 
महागाईवर सरकारने नियंत्रण मिळवले, काळयापैशा विरोधात सरकारने लढाई सुरु केली आहे.