Join us  

एटीएमच्या रिकॅलिब्रेशनचे पैसे दिलेच नाहीत

By admin | Published: April 07, 2017 12:20 AM

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील एटीएम यंत्रांचे रिकॅलिब्रेशनचे काम करणाऱ्या लॉजिस्टिक कंपन्यांना बँकांनी अद्याप त्यांच्या कामाचे पैसे दिलेले नाहीत

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील एटीएम यंत्रांचे रिकॅलिब्रेशनचे काम करणाऱ्या लॉजिस्टिक कंपन्यांना बँकांनी अद्याप त्यांच्या कामाचे पैसे दिलेले नाहीत. बँकांनी या कंपन्यांचे जवळपास ११0 कोटी रुपये थकवल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा ८ नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानंतर दोन हजार व ५00 रुपयांच्या नव्या नोटा एटीएममधून मिळाव्यात, यासाठी या यंत्रांचे रिकॅलिब्रेशन केले होते. कॅश लॉजिस्टिक कंपन्यांनी १0 नोव्हेंबर ते ३0 डिसेंबर २0१६ या काळात रिकॅलिब्रेशनच्या कामासाठी जो दर आकारला, त्यावर आता बहुतांश बँकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ९0 टक्के बँकांनी आजतागायत रिकॅलिब्रेशनच्या कामाचे पैसे दिलेले नाहीत. रिकॅलिब्रेशनच्या कामाचा करारामध्ये समावेश नव्हता. त्यामुळे आम्ही त्या कामाचे पैसे का द्यायचे, असा बँकांचा सवाल असल्याचे समजते. नोटाबंदीच्या काळात कॅश लॉजिस्टिक कंपन्यांनी जी सेवा दिली, ते देशहिताचे कार्य असल्याने काही बँका पैसे द्यायला चालढकल करत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)